चांदवड : तालुक्यातील हरनूल परिसरातून भारत दूरसंचारची तसेच निकम वस्तीजवळील खासगी कंपन्यांची लाखो रुपये किमतीची केबल चोरून नेल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना चांदवड न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना हरनूल टोल नाक्यजवळ बाळू नाना कडाळे, सुभाष भिका सोनवणे, दोघे रा. फुलेनगर, पंचवटी, शुभम महेंद्रसिंग राजपूत, रा. त्र्यंबकवाडा सरदार चौक, नाशिक हे तिघे संशयित स्थितीत फिरताना आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी हरनूल परिसरातील भारत दूरसंचारच्या मनोऱ्याजवळील केबल व निकम वस्तीजवळील केबल चोरी केल्याची कबुली दिली. या तिघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली. न्या. आर. बी. गिरी यांच्या समोर उभे केले असता त्यांना दि. १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव हवालदार आर.एस. थोरात, मच्ंिछद्र कराड, कृष्णा ढगळे यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)
चांदवडला केबल चोरी प्रकरणी तिघांना कोठडी
By admin | Updated: September 30, 2014 22:13 IST