नाशिक : चाणक्य नीतीचा अवलंब केल्यास व्यावसायिक यशस्वी होऊ शकतो. एकट्याने व्यवसाय न करता लोकांना जोडत राहिल्यास फायदा होतो, असा कानमंत्र मॅनेजमेंट गुरू तथा चाणक्य इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक लीडरशिपचे संस्थापक राधाकृष्ण पिल्लई यांनी दिला. जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशनच्या (जितो) वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. ते म्हणाले, राजा, मंत्री, प्रजा, किल्ला, पैसा, सेना, मित्र या सात बाबी असतील तर उत्कर्ष होतो असे चाणक्य नीतीत लिहून ठेवले आहे. सध्याच्या काळानुसार नेतृत्व, व्यवस्थापक, ग्राहक, दुकान वा कार्यालय, पैसा, टीम, चांगले सोबती असतील तर व्यवसाय नक्कीच यशस्वी होऊ शकतो. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘बीएसएनएल’चे मुख्य महाप्रबंधक महेंद्र जैन, नाशिकचे महाप्रबंधक सुरेश प्रजापती उपस्थित होते. ‘जितो नाशिक’च्या वतीने तिडके कॉलनीत उभारण्यात आलेल्या ‘बिझनेस बे’ या संकुलाला पुरस्कार मिळाल्याची माहिती यावेळी संजय लोढा यांनी दिली. ग्रुपचे अध्यक्ष वर्धमान लुंकड यांनी स्वागत केले. प्रकाश संकलेचा यांनी सूत्रसंचालन केले. सचिव पंकज पाटणी यांनी आभार मानले. प्रशांत मुथा, सतीश हिरण, सुनील जैन, हेमंत दुगड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चाणक्य नीतीची सध्या गरजराधाकृष्ण पिल्लई
By admin | Updated: August 2, 2014 01:24 IST