नाशिक : हिंदू पंचाग हे ऋषिमुनींच्या दिव्यदृष्टीची प्रचिती आहे. खगोलाचे ज्ञान आत्मसात करून त्याआधारे पूर्वजांनी पंचांगाची रचना केली आहे. पंचांग हे अखंड कालापर्यंत अबाधित राहणार असल्याचे प्रतिपादन इस्त्रो सॅटेलाइट सेंटरच्या पॉवर सिस्टिम ग्रुपचे माजी संचालक नितीन घाटपांडे यांनी केले.दि प्रेडिक्शन स्कूल आॅफ वेदीक अॅस्ट्रॉलॉजीच्या वतीने गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलात आयोजित हिंदू पंचांगाला खगोलीय आधार या विषयावर घाटपांडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूरचे पंचांगकर्ते मोहन दाते उपस्थित होते. याप्रसंगी घाटपांडे पुढे म्हणाले की, हिंदू पंचांग हे पूर्णपणे कालगणनेवर आधारित आहे. प्राचीन काळात ग्रहांपर्यंत मानवी नजर पोहोचलेली नसतानाही वेळ आणि ग्रहांच्या हालचालीचा अचूक अंदाज घेतलेला आहे. ज्या प्रमाणात ग्रह आपली जागा बदलतील, त्याचेच परिमाण आधार मानून त्याची रचना करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे पंचांगातील दिवसांच्या विभागणीला खगोलशास्त्राचा मोठा आधार आहे. आजच्या काळात ही अनेक घरात पंचाग बघून कार्य केले जाते. पंचागांमधून अनेक गोष्टी माहिती नागरिकांना होते. असे ही घाटपांडे यांनी सांगितले. जगात सर्वच संस्कृतीत सात वार आणि २४ तासांचा दिवस असतो. प्राचीन असलेल्या हिंदू संस्कृतीने ही जगाला दिलेली देणगी असल्याचे घाटपांडे म्हणाले. (प्रतिनिधी)
पंचागाला खगोलीय आधार
By admin | Updated: April 17, 2016 23:48 IST