सातपूर : नवीन प्रस्तावित विकास आराखडा तयार करणारे नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांची बदली रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली असून, समितीने याबाबत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना नुकतेच निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नाशिक महापालिकेतील नगररचना विभागाच्या तत्कालीन सहसंचालक सुलेखा वैजापूरकर यांनी प्रस्तावित विकास आराखडा तयार करताना धनदांडग्यांचे आणि बांधकाम व्यावसायिकांचे हित जपल्याने शेतकरी भूमिहीन होणार होते; परंतु वेळीच शेतकऱ्यांनी विरोध केल्याने हा प्रस्तावित विकास आराखडा स्थगित करून नवीन आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने प्रकाश भुक्ते यांची नियुक्ती केली होती. आराखडा तयार करण्याचे काम सुरू असताना भुक्ते यांची बदली झाली आहे. सदर बदली रद्द करावी, अशी मागणी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शेतकरी कृती समितीच्या वतीने नितीन निगळ, गणेश मौले, नामदेव भंदुरे, सखाराम घाटोळ, केशव निगळ, मुरलीधर भंदुरे, रतन निगळ, दादा निगळ, शिवाजी निगळ, शरद घाटोळ आदिंसह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
.भुक्ते बदली प्रकरणी शेतकरी कृती समिती एकवटली
By admin | Updated: September 1, 2014 01:24 IST