कळवण : शेतकऱ्यांकडील गावठी कांदा संपत आल्याने भाव वाढले आहेत. कांद्याला पर्याय म्हणून कोबी व मुळा या पिकांची लागवड वाढली आहे. तालुक्यात कमी कालावधीत येणाऱ्या कोबीची लागवड वाढली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे पिकावरील पाकुळी व आळीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा अनाठाई खर्च वाढला आहे. उन्हाळी कांदा संपत आलेला आहे. पावसाने दडी मारल्याने नवीन लाल कांद्याची लागवड बहुतांशी भागात झाली नसल्याने नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अजून अवधी लागणार आहे. देशी कांद्याबरोबर परदेशी कांदाही भाव खाण्याची चिन्हे अजून काहीकाळ दिसत आहेत. बाजारातील कांद्याची कमतरता लक्षात घेऊन व मागणी बघून कमी कालावधीतील व कमी पाण्याचे पीक म्हणून कोबीकडे पाहत आहे. कळवण तालुक्यात ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी कोबीची लागवड करण्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने व वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर पाकुळी, आळी, मावा, तुडतुडी, करपा, घाण्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे वारंवार वेगवेगळ्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. औषधांचा अनाठाई खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडत आहे. हवामानातील सततच्या बदलांमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. नगदी पीक नुकसानीचे ठरत आहे. आधीच पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया गेला . थोडेफार पैसे मिळण्याच्या आशेने केलेले कोबी लागवड तोट्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. बाजारभाव घसरल्यावरही १०० टक्के नुकसान होणार आहे. पिकाची वाढ अंतिम टप्प्यात असल्याने व विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.(वार्ताहर)
वातावरणातील बदलामुळे कोबी पिकाला धोका
By admin | Updated: August 25, 2015 00:19 IST