गिरीश जोशी ल्ल मनमाडनांदगाव येथे बांधण्यात आलेल्या अद्यावत अशा तहसिल कार्यालयाच्या इमारतीमधे पाण्याचा खडखडाट असल्याने येथे कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना तहान भागवण्यासाठी विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. तर पाण्याअभावी शौचालयांना ताळे ठोकण्यात आले असल्याने नागरिकांना गैरसोयीना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान शौचालयाच्या चाव्या अधिकारी कक्षात ठेवण्यात आल्या असल्याने कर्मचाऱ्यांव्यतीरिक्त सामन्य नागरिकांना अन्यत्र पर्याय शोधावा लागत आहे.आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांबरोबर आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांमुळे तहसिल कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असले तरी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स मात्र बरोबरच घऊन यावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.ग्रामिण भागातून आलेल्या नागरिकांची धावपळ कमी व्हावी यासाठी सर्व शासकिय कार्यालये एकाच आवारात असावी या हेतूने नांदगाव येथे भव्य प्रशासकीय कार्यालय बांधण्यात आले आहे. तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालयासह अन्य कार्यालये याच ठिकाणी आली आहे. एकाच ठिकाणी असणाऱ्या कार्यालयांमुळे येथे येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.मात्र या हायटेक कार्यालयात पाण्याचा ठणठणाट असल्याने नागरिकांची गैरसोय होते. येथे पिण्याचे पाणीच नसल्याने आलेल्यांचे हाल होत असल्याचे पहावयास मिळते. कार्यालयातील अधिकारी वर्गासाठी पाण्याची सोय असली तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र तहान भागविण्यासाठी विकतचे पाणी आणावे लागते. सध्या निवडणुकीचा कालावधी असल्याने या कार्यालयात तोबा गर्दी असते. परिणामी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणाऱ्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स बाहेरून विकत आणावे लागत आहेत.
तहसील कार्यालयात विकतचे पाणी
By admin | Updated: September 26, 2014 23:35 IST