नाशिक : सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीने महासभेला सादर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप महासभेने मंजूर केलेला ठराव प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. महासभेचा ठराव रखडल्याने प्रत्येक नगरसेवकासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेल्या विकासनिधीतील कामांनाही ब्रेक लागला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्वरित काळात प्रभागातील कामांसाठी नगरसेवकांनी मात्र प्रशासनाकडे तगादा लावला आहे.सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी दि. २६ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यावर स्थायी समितीने ३८० कोटींची वाढ सुचविल्याने अंदाजपत्रक १७३७.९६ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले.स्थायी समितीने अंदाजपत्रकात नगरसेवक निधी ६० लाख रुपये तसेच महापौर निधी म्हणून ३ कोटी, उपमहापौर व स्थायी समिती सभापतीसाठी दोन कोटी, प्रभाग सभापतींसाठी ५० लाख रुपयांच्या विकासनिधीची तरतूद केलेली आहे. स्थायी समितीने आपले अंदाजपत्रक दि. २८ जून रोजी महासभेला सादर केले होते. यावेळी महासभेत अंदाजपत्रकावर पाच तास चर्चा होऊन नगरसेवक निधीतील कामे वेळेवर मार्गी लागतील काय, अशी शंका उपस्थित केली होती. दरम्यान, नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगरसेवक निधीबाबत चर्चा सुरू झाली. महापौरांकडे सर्व गटनेत्यांची बैठक होऊन ५० लाख रुपयांचा विकास निधी प्रत्येक नगरसेवकाला मिळावा यावर एकमत झाले. परंतु आयुक्तांकडून ३० लाखांच्यावर निधी देण्याबाबत असमर्थता दर्शविली जात होती. अखेर विकासनिधी ५० लाखांवर आणण्यात आणि त्यासाठी आयुक्तांची संमती मिळविण्यात पदाधिकारी यशस्वी ठरले आहेत. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून महासभेचा ठरावच प्रशासनाला प्राप्त झाला नसल्याने विकासनिधीतील कामांना चालना देण्यात अडथळा उत्पन्न झाला आहे. प्रत्येक प्रभागासाठी ५० लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याने सुमारे १५ ते २० नगरसेवकांनी लेखा विभागाला कामांची यादीही सादर केली आहे, परंतु ठरावच प्राप्त नसल्याने लेखा विभागालाही फाईल पुढे सरकविणे अडचणीचे बनले आहे. (प्रतिनिधी)
महासभेचा ठराव रखडल्याने विकासनिधीच्या कामांना ब्रेक
By admin | Updated: August 24, 2016 01:33 IST