पेठ : दुष्काळामुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असले तरी पेठसह जोगमोडी, करंजाळी, कोहोर, तोंडवळ, खोकरतळे, कुंभाळे आदि गावांमध्ये पाण्याचाही व्यापार केला जात असल्याने दुष्काळ असूनही या व्यावसायिकांना सुकाळ आलेला दिसून येतो़ पेठ शहराला शिराळे कुंडातून पाणी पुरवठा केला जात असला, तरी नगरपंचायतीच्या तिजोरीत अजूनही पैशांचा खडखडाट दिसून येत असल्याने सुरळीत पाणी देणे कठीण होत आहे़ त्यामुळे खासगी टँकरवाल्यांचे चांगलेच फावले असून, यामध्ये छोटा हत्ती जोरात आहे़ एका लहान वाहनावर शंभर- दोनशे लिटरच्या टाक्या ठेवून प्रती दोनशे लिटर साठ रुपयांपर्यंतचा भाव मिळत असल्याने अनेकांनी प्रवासी वाहतूक सोडून आपली वाहने पाणी वाहतुकीस लावली आहेत, तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला टँकर जोडून खेड्यापाड्यातही पाणीपुरवठा केला जात आहे़ सध्या तालुक्यात लग्नसराई जोरात असल्याने मुलीचे लग्न काढायचे म्हणजे सर्वात आधी पाण्याची व्यवस्था करण्याचा ताण वधुपक्षाला जाणवत असतो़ यामुळे अखेर पाणी विकत घेऊन वऱ्हाडी मंडळींची तहान भागवण्याचे काम करावे लागत असल्याने लग्नाच्या खर्चातही वाढ होताना दिसून येते़
मोठ्या गावांमध्ये पाण्याचा धंदा जोरात
By admin | Updated: May 8, 2016 22:55 IST