त्र्यंबकेश्वर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबोली धरणातील जलाशयाने तळ गाठला असून, केवळ तीनच आठवडे पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचे दिसून येत आहे. धरणातून शेतीसाठी उचलण्यात येणारे पाणी बंद केले आणि पाण्याचा वापर जपून केला तरच पाणी पुरेल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख बाळासाहेब फसाळे यांनी सांगितले.त्र्यंबक शहराला सध्या ७० टक्के पाणी अंबोली धरणातून व ३० टक्के पाणी गौतमी-गोदावरी (बेझे) धरणातून देण्यात येत आहे. या दोन्हीही धरणांतील पाणीसाठा जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांबरोबरच त्र्यंबकवासीयांची पाण्याची स्थिती गंभीर होणार आहे. पावसाच्या हुलकावण्या सुरूच आहेत. आकाशात जमा झालेले काळे ढग इतरत्र जात आहेत. अन् पाऊस झालाच तर तो रिमझिम स्वरूपाचा आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली असून, त्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहणार आहे. पाण्याचा साठा संपुष्टात येत असल्याने पाऊस पडेपर्यंत पिण्याच्या पाण्याचा वापर नागरिकांनी काटकसरीने करावा व पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासन व पालिका पदाधिकाऱ्यांनी केले आहे. (वार्ताहर)
अंबोली धरणाने गाठला तळ
By admin | Updated: June 30, 2016 00:47 IST