खामखेडा : गावाची ओळख आता टमाटे उत्पादक गाव म्हणून इतर राज्यांमध्ये झाल्याने गुजरात राज्यातून टमाटे खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊ लागले आहेत.गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या हवामानामुळे कांदा, डाळींब आदि नगदी पिके धोक्यात आली आहेत. या परिसरातील शेतकरी डाळींब पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करीत होता. त्याच्यातून त्याला चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. तेव्हा शेतकऱ्याने टमाटे पिकाची लागवड केली. सुरुवातीला टमाट्याचे रोपे खराब झाली. परंतु हिंमत न हारता पुन्हा रोपे टाकून लागवड केली. टमाट्याचे पीक चांगले आले. सुरुवातीला थोड्या प्रमाणात टमाटे निघत होते तेव्हा गुजरात येथील सुरत, बडोदा, अहमदाबाद येथे विकण्यासाठी घेऊन जावे लागत असे. परंतु आता गुजरातमधील सुरत, बडोदा, अहमदाबाद तसेच मध्ये प्रदेशातील काही व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर टमाटे खरेदी करत आहेत. याच्यातून गावातील काही तरुणांना या व्यापाऱ्यांकडून कमिशन मिळते. माल पाहून त्याचा भाव केला जातो. शेतातून टमाटे तोडून बांधावर आणायचे आणि व्यापाऱ्याची माणसे पेपर टाकून प्लॅस्टिक कॉरेटमध्ये भरून घेतात. (वार्ताहर)
परप्रांतातील व्यापारी टमाटे खरेदीसाठी बांधावर
By admin | Updated: May 4, 2016 23:09 IST