आडगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आडगाव शाखेत जवळपास वर्षभरापासून लाखो रुपयांची रक्कम खात्यावर जमा असताना अवघे दोन हजार रुपये मिळत असून, स्वत:चे पैसे मिळवण्यासाठी बँकेत रोज चकरा माराव्या लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.५) सकाळी आडगाव शाखेला टाळे ठोकून आंदोलन केले. आंदोलकांनी प्रवेशद्वाराला कुलूप लावून तेथेच ठिय्या मांडत आंदोलन केले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आडगाव परिसरासह विंचूर गवळी या पंचक्रोशीतील शेतकºयांचे खाते आहे. या शाखेत चार हजार खातेदार असून सर्व खात्यांवर २० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मागील वर्षभरापासून पीककर्जही मिळालेले नाही. शिवाय आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शेतकरी खातेदार बँकेत चकरा मारत आहेत. सकाळी बँकेत यायचे, हेड आॅफिसवरून कॅश येण्याची वाट बघायची, पैसे मिळाले तर ठीक नाही तर रिकाम्या हाती परत जायचे यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. शेती कामांसाठी, मजुरीसाठी, लग्नकार्यासाठी वेळप्रसंगी पोटाला पिळ देऊन जमा केलेली हक्काची रक्कमदेखील मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. महिना पंधरा दिवसांत दोन हजार रु पये मिळतात. त्यासाठीदेखील आपली सर्व कामे बाजूला ठेवून बँकेत ठिय्या द्यावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी व खातेदारांनी बँकेच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी आडगाव शाखेला टाळे ठोकून आंदोलन केले. बँकेत पैसे येत नाही तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही, असा पवित्रा घेत नगरसेविका तथा विधी सभापती शीतल माळोदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व ठेवीदारांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. त्यावेळी बँक कर्मचाºयांकडून पाच हजार रु पये आठवड्याला देण्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर ११.४५ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. त्यावेळी पोलीस पाटील एकनाथ मते, नितीन माळोदे, पोपट लभडे, त्र्यंबक शिंदे, युवराज माळोदे, प्रकाश शिंदे, अशोक माळोदे, संदीप माळोदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आंदोलन मागे घेतल्यानंतर बँकेत पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली.
बँकेची मनमानी : दोन हजारांत लग्नाचा खर्च भागवायचा कसा? जिल्हा बँकेच्या शाखेला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:22 IST
आडगाव : जिल्हा बँकेच्या आडगाव शाखेत लाखो रुपयांची रक्कम खात्यावर जमा असताना अवघे दोन हजार रुपये मिळत असून, चकरा माराव्या लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.५) सकाळी आडगाव शाखेला टाळे ठोकून आंदोलन केले.
बँकेची मनमानी : दोन हजारांत लग्नाचा खर्च भागवायचा कसा? जिल्हा बँकेच्या शाखेला ठोकले टाळे
ठळक मुद्देसर्व खात्यांवर २० कोटी रुपयांच्या ठेवी आहेतरिकाम्या हाती परत जायचे यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत