नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ८० टक्के खरी माहिती ज्योतिषांनी हमीपूर्वक द्यावी, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले होते; परंतु एकाही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नसल्याचे अंनिसने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, फलज्योतिष हे विज्ञान नसल्याचा पुनरुच्चारही अंनिसने पत्रकात केला आहे.अंनिसने पत्रकात म्हटले आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी अंनिसने तमाम ज्योतिष अभ्यासकांना निकालाची खरी माहिती देण्याचे आव्हान दिले होते. मात्र, कुणीही हे आव्हान स्वीकारले नाही. याशिवाय ज्या ज्योतिषांनी परस्पर स्वत:ची जी भाकीते केली ती पूर्णत: फेल गेली आहेत. ज्योतिषांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून अशास्त्रीय, निरूपयोगी व दैववादी भूलथापा देत दावे केले जातात. परंतु त्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. विज्ञान ठरण्यासाठी गृहितके मांडावी लागतात. फलज्योतिषाबाबत गृहितके व त्यातील विसंगती लगेच लक्षात येते. कुंडलीतील राहू-केतू अस्तित्वात नाहीत. अमक्या ग्रहाचा तमका परिणाम हे कळण्यासाठी इतर ग्रहांचा परिणाम थांबवून तपासणे गरजेचे आहे, परंतु ते शक्य नाही. आकाशस्थ पोकळीचे बारा भाग करून त्यांना दिलेले गुणधर्म यालाही काडीचा आधार नाही. कोणती जन्मवेळ मानायची आणि तीच का मानायची याला कसलेही शास्त्रीय स्पष्टीकरण नाही. ज्योतिष ही एक कला असून माणसाला आधार आणि उज्ज्वल भवितव्य यांचे स्वप्न ही कला विकत असते. त्यामुळे ज्योतिष हे शास्त्र नसल्याचा दावाही अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे व शहर कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांनी पत्रकात केला आहे.
फलज्योतिष हे विज्ञान नाहीच अंनिसचे मत : निवडणूक निकालात ज्योतिषशास्त्र फेल
By admin | Updated: May 26, 2014 19:21 IST