त्र्यंबकेश्वर : विजेच्या चमचमाटात, ढगांच्या गडगडाटांसह आज सायंकाळी ८ वाजता मृगराजाचे आगमन झाले. दोन दिवस उशिराने का होईना; पण मान्सून बरसला. बळीराजाने पेरणीची पूर्ण तयारी केली आहे. काहींनी पेरणीही पूर्ण केली आहे. मात्र प्रतीक्षा होती ती पावसाची.गेल्या २/३ दिवसांपासून त्र्यंबकला सकाळी आकाश मेघाच्छादित असते असे वाटते. पाऊस येईल, मात्र पाऊस येत नव्हता. सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आभाळ मोकळे होते आणि उन्हाचा तडाखा सुरू होत असतो. सायंकाळी परत ढगाळ वातावरण होत असते. वारा सुटतो पण पाऊस मात्र पडत नव्हता. आज मात्र सायंकाळी ढग भरून आले. वारा सुटला आणि वातावरण शांत झाले. त्यानंतर केवळ अर्ध्या तासाने पुनश्च वारा सुटला आणि वाऱ्याबरोबरच मृगराजा बरसला. वातावरणात गारवा आला. गाफील भाविकांची तारांबळ उडाली. पळापळ झाली. काही जण तर चिंब भिजले. तरीही पहिल्या पावसाची मजा घेत शांतपणे चालत होती. दिवसभर ऊन आणि उष्म्याने घायाळ झालेल्यांना मात्र पावसामुळे दिलासा मिळाला.तालुक्यासह शहरातील बळीराजा सुखावला आहे. आता शेतीच्या कामाला वेग येईल. पेरण्या, बी-बियाणे खरेदी, ग्रामीण भागात चार महिन्यांची बेगमी केली जाईल. खते खरेदी जोरात सुरू आहे. खरीप हंगामासाठी लागवड खर्चासाठी काही जण सहकार संस्था, सहकारी बँकांचे उंबरठे झिजविण्यास यापूर्वीच प्रारंभ झाला आहे. मालेगाव : शहरासह तालुक्यात विजांचा कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात मोठे नुकसान झाले. शहरातील असंख्य झाडे उन्मळून पडली; विजेचे खांब वाकले; तर तालुक्यात मळगावी समाजमंदिर उद्ध्वस्त झाले. वीज कोसळून नगावला बैल तर पिंपळगावला गाय ठार झाली. टेहरेत दोन जण जखमी झाले. शहरासह परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. वादळामुळे शहरातील मोठमोठी झाडे उन्मळून पडली तर विजेचे खांबही पडल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरातील काही भागात अंधाराचे साम्राज्य होते.टेहरेत दोन जखमीटेहरे : येथे वादळी पावसामुळे दोन घरे कोसळली; तर सुमारे २० घरांचे पत्रे उडाले. वादळात रेखा सीताराम शेवाळे आणि अमोल सीताराम शेवाळे हे दोघे जखमी झाले. त्यांचेवर मालेगावी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेहरे शिवारातील शेकडो वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबली. विजेचे खांबही पडल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. सरपंच दत्तात्रय पाटील व माजी सरपंच अरुण पाटील यांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. पावसामुळे साठवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले; तर डाळिंबाच्या बागाही वादळामुळे उद्ध्वस्त झाल्या.अजंग-वडेलला वादळी पाऊसवडेल : मालेगाव तालुक्यातील अजंग-वडेल परिसरात सायंकाळी विजांचा कडकडाटासह तुफान वादळी पाऊस झाला. यात विजेच्या तारा तुटल्या; तर विजेचे खांब पडले. अजंग येथे झाडाच्या फांद्या अंगावर कोसळल्याने दुचाकीस्वार दबला. ग्रामस्थांनी त्याच्या अंगावरुन फांद्या काढल्या. घरांसह दुकानांचेही पत्रे वादळात उडाल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले.बैल-गायीचा मृत्यूतालुक्यातील नगाव दिगर येथे वीज कोसळून बैल ठार झाला तर पिंपळगाव दाभाडी येथे वीज कोसळून शेतकऱ्याची गाय दगावली.मळगावी समाजमंदिर उद्ध्वस्तमळगाव : तालुक्यातील मळगाव नागुजीचे येथे विजांच्या कडकडाटसह झालेल्या वादळी पावसात गावातील समाजमंदिर उद्ध्वस्त झाले तर युवराज उशीरे यांची गाय पत्र्याच्या शेडखाली दबल्याने मरण पावली. मळगावी झाडे उन्मळून पडली तर घरांचे पत्रे उडाले. शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचेही मोठे नुकसान झाले.