पंचवटी : दिंडोरी रोडवरील तारवालानगर, हिरावाडी जोडरस्ता तसेच पेठरोड सिग्नलवर वारंवार अपघात होत असल्याने गतिरोधक बसवावे, अशी मागणी करूनही मनपा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी भेटत नसल्याने तारवालानगर येथील शिवसैनिकांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकविले. दिंडोरी रोडवर कधी हायमास्ट बंद तर कधी सिग्नल बंद पडत असल्याने वारंवार अपघात घडतात. परिसरात घडणाऱ्या या अपघाताच्या घटनांमुळे अनेकदा विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. वाहनांची कायम वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसैनिक संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता ते जागेवर नसल्याने शिवसैनिकांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकाविले. यावेळी महेंद्र बडवे, संदीप शेजोळे, तुषार ठाकरे, पार्थ केतकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
मनपा अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चिकटविले मागण्यांचे निवेदन
By admin | Updated: January 20, 2016 23:19 IST