इगतपुरी : मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची शेवटची कट बोगी काढून त्याजागी प्रवाशांना बसण्यासाठी कमी आसन क्षमतेची बोगी जोडण्यात आल्याने प्रवाशांचे व पासधारकांचे हाल होत असून, नवीन बोगी बसविण्यात यावी, अशी मागणी पंचवटी रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.मुंबईत नोकरीसाठी जाणारे चाकरमाने, उद्योगधंद्यानिमित्त जाणारे व्यावसायिक व प्रवासी यांची हक्काची म्हटली जाणारी मनमाड -मुंबई पंचवटी एक्स्प्रेस या गाडीतील शेवटची ६० आसनक्षमता असलेली बोगी गेल्या दोन महिन्यांपासून काढण्यात आली असून, त्याजागी २० प्रवासी आसनक्षमता असलेली बोगी जोडण्यात आली आहे. यामुळे शेवटच्या बोगीत बसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहेत.शेवटच्या कट बोगीत यापूर्वी ६० आसनक्षमता असलेली मोठी बोगी होती. त्याच बोगीला अपंग व गार्ड बोगी जोडलेली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारण दाखवीत ती बोगी मेंटेनन्ससाठी बदलविली असून, त्याजागी २० प्रवासी असलेली छोटी बोगी व त्याला जोडून सामान वाहतुकीच्या दोन लगेच बोग्या व गार्ड बोगी अशी कट बोगी दिली आहे. दिवसेंदिवस पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रवासीसंख्येत वाढ होत असल्याने रेल्वे प्रशासनाने जुनी बोगी काढल्याने पासधारक संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, पंचवटी एक्स्प्रेसमधील समोरासमोर आसन असलेल्या ५ ते ६ बोग्या काढण्यात आल्या असून, त्याजागी एका बाजूला तोंड असलेली आसनव्यवस्था असलेल्या बोग्या बसविण्यात आल्या आहेत.नाशिक-मुंबई प्रवास जवळपास तीन ते चार तासांचा असून, या नवीन बोगीतील आसनव्यवस्था तांत्रिकदृष्ट्या चुकीची असून, दररोज प्रवास करणाऱ्या अनेक पासधारकांना पाठदुखीचा त्रास होत असल्याची तक्र ार केली आहे.
‘पंचवटी’ची जुनी कट बोगी काढल्याने पासधारकांत संताप
By admin | Updated: August 9, 2014 00:56 IST