राजारामनगर : कादवा सहकारी साखर कारखान्याने सन २०१३-१४ या गळीत हंगामात एकूण २,२५,९९० मे. टन उसाचे गाळप करून २,२५,३११ क्विंटल साखर निर्मिती केली असून, साखर उतारा ११.३० टक्के मिळाला आहे.कार्यक्षेत्रातील १,३८,६९२ मे. टन व गेटकेन ८७,२९८ मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. गाळप केलेल्या उसासाठी प्रति मे. टन रुपये २००० दर दिला, परंतु जानेवारी २०१४ पासून साखरेचे बाजारातील कमालीचे खाली असलेले दर विचारात घेऊन बँकेने मालतारणातील उचल दर कमी केला होता. त्यामुळे जानेवारी २०१४ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत रुपये १९२३ प्र.मे. टनाप्रमाणे पेमेंट अदा केले. उर्वरित फरक रक्कम रुपये ७७ प्र. मे. टनाप्रमाणे उसाचे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांचे बँक खाती वर्ग केल्याचे कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले.या गळीत हंगामात कारखान्याकडे गेटकेनसह एकूण ५१०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली असून, आवश्यक व पुरेशे ऊस तोडणी मजूर भरण्यात आलेले आहे. गळीत हंगामाच्या तयारीसाठी यंत्रसामुग्री दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत. गळीत हंगाम नियोजित वेळेत सुरू करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
कादवातर्फे फरक रक्कम बँकेत वर्ग
By admin | Updated: August 6, 2014 00:46 IST