ताहाराबाद : बागलाण तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला असून, रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीबाबत शेतकरी द्विधा मन:स्थितीत दिसून येत आहे.गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमानात प्रचंड प्रमाणात घट झाली असून, यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. पाण्याच्या उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांनी विहिरीची खोली वाढविली, बोअर केले मात्र अपेक्षित जलसाठा हाती न आल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली.यावर्षी तर पावसाने पूर्ण पाठ फिरविल्याने रब्बी तर सोडा, पण खरीप हंगामही हातातून गेला आहे. त्यामुळे रब्बीचा विचारच न केलेला बरा असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काही भागात आज विहिरींना कमी अधिक प्रमाणात पाणी आहे. त्या पाण्यावर रब्बीची लागवड करावी का याबाबत शेतकरीवर्गापुढे प्रश्न उभे आहेत.कारण हे पाणी कितीकाळ पुरेल याची शाश्वती नाही. त्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून, लोकांना आतापासूनच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. परिणामी यंदा रब्बी पिकांच्या लागवडीत मोठी घट भरून येणार आहे. (वार्ताहर)
बागलाण तालुक्यात अत्यल्प पावसाने शेती धोक्यात
By admin | Updated: November 19, 2015 22:20 IST