पांगरी : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी व योजनेचा खोटा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पांगरी ग्रामस्थांचे सुरू असलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मध्यस्थीनंतर सोडण्यात आले. वाजे यांनी आंदोलनकर्त्यांचे व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांचे भ्रमणध्वनीहून बोलणे करून दिले. शंभरकर यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बैरागी व आंदोलनकर्त्यांनी उपोषण सोडले. सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे सुुमारे एक कोटी रुपये खर्चून करण्यात आलेले राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले असतानाही त्याचा पांगरीकरांना उपयोग होत नसल्याने ग्रामस्थांना विकत पाणी घ्यावे लागत असल्याची तक्रार भाऊसाहेब बैरागी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. सदर योजनेच्या चौकशीसाठी बैरागी यांनी वारंवार निवेदने देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्याचाही उपयोग होत नसल्याने बैरागी यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी पांगरी येथे येऊन ग्रामस्थांचे जाबजबाब घेऊन योजनेचा स्रोत व विहीरीची पाहणी केली व त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. तथापि, नंदनवरे यांनी सदर योजनेचा खोटा चौकशी अहवाल दिल्याची तक्रार करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वत: चौकशी करावी व खोटा चौकशी अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बैरागी यांच्यासह अरविंद निकम, बाळासाहेब निकम यांच्यासह कार्यकत्यांनी पंचाळे शिवारातील डांबर नाल्यावरील योजनेच्या उद्भव विहिरीजवळ सोमवारपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला होता. मंगळवारी सकाळी गटविकास अधिकारी धनंजय जगताप, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एम. व्ही. बोरोले, शाखा अभियंता एन. पी. देशमुख, विस्तार अधिकारी बी. के. बिन्नर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, बैरागी यांचे समाधान न झाल्याने ते उपोषणावर ठाम राहिले होते. (वार्ताहर)
आश्वासनानंतर पांगरीकरांनी उपोषण सोडले
By admin | Updated: May 4, 2016 23:24 IST