दत्ता दिघोळे नायगावनिफाड तालुक्यातील चांदोरी येथे गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक झाल्याने उघडे पडलेल्या पेशवेकालीन, पौराणिक हेमाडपंती मंदिरांचे दरवाजे खुले करण्यात आले आहे. तब्बल ३१ वर्षांनी दुर्मीळ इंद्रदेव मंदिर व शिवालय दर्शनाचा योग आल्याने हा पौराणिक शिल्पकलेचा ठेवा पाहण्यासाठी पर्यटक, भाविकांची मोठी गर्दी होत आहे.सध्या सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. दुष्काळातही हिरवागार दिसणारा निफाड तालुक्यालाही यंंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. गोदावरीच्या पात्रातील पाणी आटल्याने कायम पाण्याखाली राहणारी अनेक मंदिरे उघडी पडल्याने पर्यटक व भाविकांसाठी पर्वणी ठरत आहे. सायखेडा व चांदोरी या दोन्ही गावांच्या मधून वाहणारी गोदावरी यंदा अनेक वर्षांनंतर पूर्णपणे कोरडीठाक पडल्याने दुष्काळाची तीव्रता लक्षात येते. तब्बल ३१ वर्षांनंतर गोदावरी नदीपात्रातील विविध देवतांची प्राचीन मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने परिसरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. अत्यंत दुर्मिळ असलेल्या इंद्रदेव मंदिरासह हेमाडपंती व इतर पौराणिक मंदिरांवरील कलाकुसर बघून भाविक हरखून जात आहेत.वर्षानुवर्षे पाण्याखाली राहिल्यानंतरही ही मंदिरे अद्याप सुस्थितीत आहेत. मंदिर परिसरात बांधलेले घाट, छोटी भूमिगत मंदिरे, पुरातन मूर्तींचे शिल्प बघण्यासारखी आहेत. या घाटांवर फिरण्यासाठी दगडांचे बांधीव रस्ते, सध्याही पाण्याने भरलेल्या अनेक विहिरी, मंदिरांसमोरील दगडी कलाकुसर बघणाऱ्याच्या तोंडून आपसूक कौतुकाचे बोल बाहेर पडतात. अनेक जुन्या मूर्ती उघड्या पडल्या असून, त्या सुस्थितीत आहेत.वरुणदेवाने दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी सूर्याच्या सांगण्यावरून इंद्राने येथे तप केल्याची अख्ख्यायिका आहे. मंदिरात इंद्राची मूर्ती, बांधीव दगडी घाट, उजव्या सोंडेचा गणपती, शेषनाग, कार्तिक स्वामी व महादेवांचे दोन मंदिरे, लहान-मोठे अनेक शिवलिंग याठिकाणी आढळतात. घाटाच्या मध्यभागी पाण्याने भरलेली विहीर पर्यटकांचे लक्ष वेधून घेते तर भगवान शंकराची भूमिगत मंदिरेही भाविकांना पौराणिकतेची साक्ष देतात.नदीपात्राच्या दोन्ही टोकांपर्यंत दगडाचा बांधीव रस्ता येथील मंदिरे पूर्वीच्या काळी कायमस्वरूपी उघडी राहत असल्याचा पुरावा मानला जातो. १९०७ मध्ये ब्रिटिशांनी नांदूरमधमेश्वर धरण बांधले, त्यावेळी गोदावरीचा प्रवाह बदलून गावाच्या कडेने घेतल्याने हा पौराणिक वास्तूंचा ठेवा पाण्याखाली गेल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून भीषण दुष्काळाने गोदावरीचे पात्र पूर्ण आटल्यानंतरच या मंदिरांचे दर्शन घेण्याचा योग येत आहे. १९८४-८५ नंतर आता ३१ वर्षांनी ही संधी निर्माण झाली आहे. सर्वच मंदिरे काळ्या पाषाणात कोरलेली असून, त्यांची मांडणी व कलाकुसर लक्ष वेधून घेते. मोठ्या कालावधीनंतर उघडी पडलेले दगड, गोटे, शिंपले, शंख पर्यटकांना आकर्षित करताना दिसत आहे. पुरातन आणि देखणी वास्तुकला आणि दुर्मीळ इंद्र मंदिराच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभरातील भाविक याठिकाणी हजेरी लावताना दिसत आहेत.
तब्बल ३१ वर्षांनी आला इंद्रदर्शनाचा योग
By admin | Updated: March 31, 2016 23:12 IST