नाशिक : ध्वनिप्रदूषणाच्या नियमानुसार बंदिस्त ठिकाणे वगळता सार्वजनिक ठिकाणी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक लावण्यास परवानगी नव्हती़ या नियमावलीत महाराष्ट्र सरकारने सोमवारी (दि़५) बदल केल्याचा अध्यादेश काढला असून, त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम व धार्मिक सणांकरिता वर्षभरातून पंधरा दिवस रात्री दहा ऐवजी बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार आहे़ हे पंधरा दिवस कोणते असावेत याची जबाबदारी राज्य शासनाकडे असणार आहे़दरम्यान, शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याने याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व ध्वनिप्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाची असणार आहे़ केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे व सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद ठिकाणांव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत करता येत नाही़ या नियमामध्ये ११ आॅक्टोबर २००२ च्या अधिसूचनेद्वारे केंद्र शासनाने सुधारणा केली असून नियम ५ मध्ये उपनियम (३) चा नव्याने समावेश करण्यात आला आहे़ त्यानुसार ध्वनिप्रदूषणाची पातळी विहित मर्यादेत राखून वर्षभरामध्ये १५ दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर बंदिस्त ठिकाणे वगळता सार्वजनिक ठिकाणी रात्री १० ऐवजी १२ पर्यंत सांस्कृतिक व धार्मिक सणांकरिता करता येणार आहे़ ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकासाठीच्या मर्यादेसाठी कोणते पंधरा दिवस ठेवावेत, याची जबाबदारी राज्य शासनाची आहे़ याबाबत दाखल असलेल्या जनहित याचिकेत उच्च न्यायालयाने १६ आॅगस्टला २०१६ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सरकारने हा अध्यादेश काढला असून, ध्वनीची विहित मर्यादा राखून वर्षभरातील पंधरा दिवस सकाळी सहा ते रात्री वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार आहे़ महाराष्ट्र शासनाने काढलेला या अध्यादेशावर पर्यावरण संचालक डॉ़ बी़ एऩ पाटील यांची स्वाक्षरी आहे़ (प्रतिनिधी)
१२ वाजेनंतरही वाजणार भोंगा
By admin | Updated: September 6, 2016 01:01 IST