नाशिक : कुंभमेळ्यातील प्रथम शाहीस्नान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना, प्रमुख साधू-महंतांमध्ये मात्र संघर्षाचा आखाडा रंगला आहे. सोमवारी दिवसभर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्याने या वादांनी आणखी गंभीर स्वरूप धारण केले असून, यामुळे प्रशासन मात्र प्रचंड तणावाखाली आले आहे. गेल्या शुक्रवारी चतु:संप्रदाय आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या वेळी साधू-महंतांतील वाद उफाळून आला होता. दिगंबर अनी आखाड्याचा पंचरंगी ध्वज न फडकावल्याने या आखाड्याने सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता; मात्र या आखाड्याचे तीन खालसे मात्र सोहळा पूर्ण होईपर्यंत थांबून राहिले होते. त्यांच्या या कृतीमुळे दिगंबर अनी आखाड्याचा अपमान झाल्याचे सांगत रविवारी आखाड्याचे श्री महंत कृष्णदासजी महाराज, श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी आपल्या अंतर्गत खालशांची बैठक बोलावली होती. महंत माधोदास यांच्या सूचनेवरून संबंधित तिन्ही खालशांना कुंभमेळ्यातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास यांचे अध्यक्षपदही अमान्य केले होते. या प्रकरणाचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले. श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करीत महंत ग्यानदास यांच्यावरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. महंत ग्यानदास यांचे समर्थन त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांनी यापूर्वीच काढले असून, आता दिगंबर अनी या मुख्य आखाड्यानेही हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे सध्या आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावर कोणीही नाही. पुढच्या वर्षी तेरा आखाडे एकत्र येऊन नव्या अध्यक्षांची निवड करणार असल्याचे ते म्हणाले. बहिष्कृत केलेल्या खालशांनी माफी मागितल्यास त्यांच्याबाबत पुनर्विचार होऊ शकेल, असेही ते म्हणाले. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून, काही अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश येऊ शकले नसल्याचे वृत्त आहे.जोड आहे...
प्रशासन तणावाखाली : आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींमुळे साधुग्राम तापले
By admin | Updated: August 25, 2015 00:07 IST