सटाणा : वेळ सकाळी १० वाजेची.. दोन चिमुकल्यांची चुलीवर स्वयंपाकाची लगबग.. अचानक वादळ येते.. वादळातून निर्माण झालेली भयानक भवरी.. काही क्षणात चुलीचा भडका होतो आणि सुरू होते अग्नितांडव.. क्षणार्धात ४८ जणांचे संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात अन् कष्टाने फुलवलेल्या संसाराचे होत्याचे नव्हते होते. ही भीषण दुर्घटना गुरुवारी सटण्यातील अचानकनगर या आदिवासी वस्तीत घडली. त्यात ४१ पाळीव जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत तीन मोटारसायकलींसह कार जळून खाक होऊन सुमारे पस्तीस लाखांची हानी झाली आहे. सटाणा शहरापासून २ किलोमीटर अंतरावर आरम नदी काठावर अचानकनगर वसाहत आहे. येथे साठ झोपडपट्टीवजा घरे वसली आहे. येथील आदिवासी बांधव मोलमजुरी करून गुजराण करतात. गुरुवारी सकाळी प्रत्येकाची कामावर जाण्यासाठी घाईगर्दी सुरू होती. यावेळी एका घरात दोन चिमुकल्यांनी घराबाहेरच चूल पेटवून स्वयंपाक केला. ते डबे घेऊन कामावर गेले. मात्र दुर्दैवाने चुलीतील विस्तव तसाच राहिला. त्यातच वादळ आल्याने चुलीने पेट घेतला. त्यानंतर अग्नीतांडव सुरु झाले. आगीचे स्वरूप भयानक असल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. बंब येण्यापूर्वीच अचानक नगर जळून खाक झाले होते. घटनास्थळी तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, माजी आमदार दिलीप बोरसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांनी मदतकार्य सुरू केले.(वार्ताहर) शिधा तत्काळ उपलब्ध करून शासकीय मदत देण्यात आली.
दुर्घटना : ४१ जनावरे होरपळून ठार ; ३५ लाखाचे नुकसान
By admin | Updated: April 30, 2015 23:35 IST