नाशिक : महापालिका आयुक्तांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकात महासभा आणि स्थायी समितीने मंजूर केलेल्या कामांची ई यादीच समाविष्ट नसल्याने गोंधळ झाला आहे. आयुक्तांचा अंदाजपत्रकाचा पायाच इतका चुकीचा असल्याने त्यावर स्थायी समितीने तयार केलेले अंदाजपत्रक तरी वास्तवाच्या कसोटीला कसे उतरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.स्थायी समितीने २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे तयार केलेले अंदाजपत्रक संमत करण्यासाठी मंगळवारी (दि. ८) विशेष महासभा बोलविण्यात आली आहे. परंतु या अंदाजपत्रकात अनेक घोळ आहेत, शिवाय आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकातच इतके चुकीची आकडेवारी सादर करण्यात आली आहे की, त्यामुळे अंदाजपत्रक व्यवहार्य ठरणार नाही, अशी अवस्था आहे. आयुक्तांनी अंदाजपत्रकात चालू कामांसाठी तरतूद, निविदा मंजूर परंतु वर्क आॅर्डर (कार्यारंभ) आदेश दिलेले नाहीत. निविदा मंजुरीच्या कार्यवाहीत आणि निविदा प्रसिद्धीच्या कार्यवाहीत अ ब क ड अशी विगतवारी केली आहे. दरवर्षी अंदाजपत्रकात ई याद्यादेखील जोडल्या जातात. महासभा किंवा प्रभाग समितीने मंजूर केलेली कामे यात समाविष्ट असतात. परंतु या याद्या जोडल्याच नसल्याने गोंधळ उडाला आहे. किमान चारशे कोटी रुपयांची कामे अंदाजपत्रकात न धरता एकूण दायित्व ७०२ कोटी रुपये म्हटले आहे. वास्तविक त्यात या चारशे कोटी रुपयांच्या कामांचा समावेश केला, तर दायित्वच हजार कोटी रुपयांवर जाते. मग ७०२ कोटी रुपयांच्या दायित्वावर आधारित अंदाज कसे खरे ठरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.आयुक्तांच्याच निवेदनात पान क्रमांक तीनवर दुबेरेसह रकमेचा उल्लेख आहे. यात एका ठिकाणी १८७५.६६, तर दुसऱ्या ठिकाणी १८७६.६९ असे दोन आकडे असल्याने कोणती आकडेवारी खरी, असा प्रश्न निर्माण होतो. नेहरू अभियानातील तरतुदींमध्येही गोंधळ असून त्याचीदेखील चौकशी होण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
आयुक्तांच्या अंदाजपत्रकात 500 कोटींचा गोंधळ
By admin | Updated: July 8, 2014 00:52 IST