मनमाड भालूर येथील एका शेतकर्याने मनमाड बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अवघा ५० रुपये भाव मिळाल्याने कांद्याच्या आलेल्या पैशात खिशातून पन्नास रुपये घालून भाडेतोडे देण्याची वेळ आली. या वैफल्यग्रस्त शेतकर्याने तोच ट्रॅक्टर पुन्हा लिलावाच्या रांगेत स्वत:ऐवजी वेगळ्या शेतकर्याबरोबर उभा केला असता त्याच कांद्याला लिलावात दोनशे रुपयांचा भाव मिळाला. ५० रुपये भावाने लिलाव झालेल्या कांद्याला तब्बल चारपट दोनशे रुपयांचा भाव मिळाल्याने भालूरच्या शेतकर्याच्या या ‘स्टिंग आॅपरेशन’बाबत बाजार समितीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. भालूर येथील शेतकरी योगेश पुंडलीक अहेर या शेतकर्याने आज आपला एक ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी मनमाड बाजार समितीत आणला. लिलावामध्ये या कांद्याला ५० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. ३० क्विंटल कांद्याच्या मिळणार्या १५०० रुपयांमध्ये ट्रॅक्टर भाडे १२५० रुपये व आडत हमाली व इतर खर्च तीनशे रुपये असा १५५० रुपयांचा खर्च देण्यासाठी या शेतकर्याला खिशातून ५० रुपये भरण्याची वेळ आली. कांद्याच्या मिळालेल्या या मातीमोल भावाने हताश झालेल्या शेतकर्याने पुन्हा ट्रॅक्टर लिलावाच्या रांगेत उभा करण्याचा निर्णय घेतला व स्वत:ऐवजी दुसर्या शेतकर्याबरोबर ट्रॅक्टर उभा केला. यावेळी लिलावात याच कांद्याला दोनशे रुपयांचा भाव मिळाला. त्याच कांद्याला पूर्ण लिलावात तब्बल चारपट भाव मिळाल्याने सुरुवातीला मिळालेला पन्नास रुपयांचा भाव शेतकर्याला आर्थिक संकटात टाकणारा ठरला आहे. मनमाड बाजार समितीमध्ये आज कांद्याची ६०० ट्रॅक्टर आवक होऊन कमाल १३००, तर किमान २०० व सरासरी ७५० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
५० रुपयांनी लिलाव झालेल्या कांद्याला मिळाला २०० रुपये भाव
By admin | Updated: May 7, 2014 23:13 IST