नाशिक : पंचायतराज समितीच्या दौऱ्यामुळे प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिल्याची चर्चा असतानाच याच पंचायत राज समितीच्या नाशिक दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेला तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संभाजीराव निलंगेकर-पाटील यांनीच याबाबत अनौपचारिक गप्पांमध्ये तसे सुतोवाच केले. आम्ही नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर येथे तीन दिवसांत कामकाजाचा आढावा घेतला. काही शक पूर्ततेबाबत विचारणा केली. तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागांकडील थकीत असलेले सुमारे २४ कोटी रुपये नाशिक जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना समितीचे उपसचिव विलास आठवले यांना सांगितल्याचे आमदार निलंगेकर-पाटील यांनी सांगितले.तसेच अन्य काही योजनांचीही थकबाकी मिळून एकूण ५० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला आम्ही उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारला दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेला इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही निधी उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्याची विकासकामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच काही अल्पशा निधीमुळे रखडलेली कामे व पाणीपुरवठा योजनाही पूर्ण होण्यास मदत होणार आहे. काही विभागांकडे जिल्हा परिषदेची असलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकीची रक्कम जिल्हा परिषदेत जमा करण्याचे आदेश त्या त्या विभागांना दिले आहेत. आमची समिती नाशिक जिल्हा परिषदेला किमान ५० कोटींचा निधी विकासासाठी उपलब्ध करून देत असल्याचे पंचायतराज समितीचे अध्यक्ष आमदार संभाजीराव निलंगेकर-पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेला ५० कोटींचा निधी
By admin | Updated: May 8, 2016 00:23 IST