नाशिक : जैन धर्मीयांचे धर्मस्थळ असलेले मांगीतुंगी आणि शिवराय यांनी मैदानी लढाई जिंकल्याची साक्ष असणारा साल्हेरचा किल्ला याचा विचार करून राज्य शासनाने या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी २७५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची घोेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले प्रथम तीर्थंकर भगवान वृषभदेव हे आदर्श शासक असल्याने ते आजही शासकांना मार्गदर्शक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मांगीतुंगी येथे १०८ फूट उंच भगवान वृषभदेव यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार सुभाष भामरे, आमदार राजेंद्र पाटणी, दीपिका चव्हाण, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते. भगवान वृषभदेव यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने शासनाच्या बृहत आराखड्यातील ४० कोटी रुपयांची कामे तातडीने हाती घेण्यात आली होती. मांगीतुंगी परिसराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून, छत्रपती शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक लढाई याच भागात झाली होती, त्यामुळे या भागाचा जाणीवपूर्वक विकास करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. भगवान वृषभदेव हे उत्कृष्ट शासक, कृषिपंडित, गणितज्ज्ञ, धन्वंतरी, साहित्य कला क्षेत्राचे जाणकार होते. (पान ५ वर)त्यांच्या काळात सर्वांना विकासाची समान संधी होती. प्रजेचे पालनपोषण कसे करावे, याचा आदर्श त्यांनी प्रस्थापित केला होता. त्यामुळे उच्चपदस्थांपासून गावातील सरपंचापर्यंत सर्वांना भगवान वृषभदेव यांच्या जीवनातून शिक्षा आणि दीक्षा घेण्यासारखी असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्रद्धा असलेल्या समाजाचे अस्तित्व कोणीही नष्ट करू शकत नाही, जगातल्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या असल्या तरी भारतीय संस्कृतीने अंधश्रद्धेऐवजी श्रद्धेला महत्त्व दिल्यानेच जैन, बौद्ध आणि हिंदू धर्म टिकून असल्याचेही ते म्हणाले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान वृषभदेव यांची केवळ १०८ फूट उंच मूर्ती नसून जैन धर्मियांच्या मूल्यांची सर्वाेच्च स्थानी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, असे सांगून मांगीतुंगीसाठी ग्रामविकास विभागामार्फत १९ कोटींच्या सुविधा दिल्याचे सांगितले. खासदार सुभाष भामरे यांनी मांगीतुंगीचा पर्यटनस्थळ विकसित व्हावा म्हणून मागणी केली. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी मनोगत व्यक्त केले.