दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथे पुरातन काळापासून नाशिक सिंहस्थाच्या वेळी साधू-महंतांच्या उपस्थितीत सिंहस्थ ध्वजारोहण होत होते. गेली चार-पाच दशके यात खंड पडला होता. मात्र ग्रामस्थांनी एकत्र येत साधू-महंतांची भेट घेऊन सदर परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, २५ आॅगस्टला बाणगंगा तीरावर साधू-संतांच्या उपस्थितीत ध्वज उभारण्यात येणार आहे.नाशिकपासून २० किमी अंतरावर व बाणगंगा तीरावर वसलेले जानोरी हे ऐतिहासिक, पारंपरिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले गाव. ४०-५० वर्षांपूर्वी येथे साधू-संत पूजन करून हत्ती, घोडे, उंट यांची सोन्या-चांदीने सजावट, तसेच सोन्याचा ध्वज हातात घेऊन मिरवणूक काढली जात होती. परंतु यात सुमारे ५० वर्षांचा खंड पडला. मात्र यावर्षी पुन्हा ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने ही परंपरा सुरू होणार आहे. संत, महात्म्यांच्या उपस्थितीत ध्वज फडकणार असल्याने गावात साफसफाईला सुरुवात झाली आहे. ध्वजओटा बांधण्यात आला असून, लाउडस्पिकरही बसविले आहेत. तर होर्डिंग्ज बनविणे, महाप्रसाद बनविणे, निमंत्रण देणे अशी कामे ग्रामस्थ करत आहेत. कमी पावसामुळे नदीपात्र कोरडे असल्याने पालखेड बंधाऱ्यातील डीपेंसच्या पाइपलाइनमधून नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून, ग्रामपंचायतीने याबाबतचे पत्र डीपेंसला दिले आहे.तसेच दिंडोरी पोलीस स्टेशनतर्फे गावाची पाहणी करण्यात आली असून, साधू-संतांची मिरवणूक कोणत्या मार्गे काढण्यात येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी दिंडोरी पोलीस स्टेशनचे जमादार वाघेरे, नरेंद्र सौंदाणे आदि पोलीस उपस्थित होते.
२५ आॅगस्टला जानोरीत होणार
By admin | Updated: August 23, 2015 23:33 IST