पोलीस सूत्रानुसार, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर गुजरात राज्याकडून येणाऱ्या ट्रक (क्रमांक आर.जे. ०९ जीडी-२६९५)ने नवापूर शहरातून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. ट्रकच्या खाली मोटारसायकल अडकल्याने साधारण दहा ते पंधरा फूट फरपटत नेल्याने यात राजू अरविंद गामीत (२२, रा. खाकरफळी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा महेश ईश्वर राठोड (२१) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताचा जोरदार आवाज आल्याने नवापूर जुन्या आरटीओ कार्यालयासमोर बंदोबस्तास असलेले पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. दोघांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ट्रकचालकाला ताब्यात घेतले. महेश राठोड मोटारसायकल चालवत होता. त्याच्यामागे राजू गामीत बसला होता. नवापूर शहरातून चिकन व नाश्ता घरी घेऊन जात असताना नेहरू उद्यानासमोरील महामार्गाच्या वळणावर हा अपघात झाला. मोटारसायकलीचे मोठे नुकसान झाले तर रस्त्यावर सर्व बाजार पडलेला होता. जखमी महेश राठोड याच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊन आक्रोश केला. मयत युवक एकुलता एक मुलगा गेल्याने त्याचे वडील मोठा आक्रोश करीत होते.
नवापूर शहरातील नेहरू उद्याननजीक महामार्गावर धोकादायक वळण असल्याने याठिकाणी नेहमी छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांचे प्राण जात आहेत. या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे. परंतु, संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने निष्पाप युवकांचे प्राण जात असल्याने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.