नंदुरबार : यंदा उशिराने आलेला पाऊस, त्यामुळे उशिराने झालेल्या पेरण्या तसेच बदललेले निकष यामुळे यंदा पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात पीक विम्याच्या न मिळालेल्या परताव्यामुळेही यंदा पीकविमा कमी काढला गेल्याचे बोलले जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यात यंदा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अर्थात पावसाळ्याच्या दीड महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. ज्या क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या त्या क्षेत्रातील पीक करपू लागलेे होते. त्यामुळे यंदा पीक विमा उतरविण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता होती. शिवाय पीक विम्याच्या शेवटची मुदत होईपर्यंत जवळपास ५५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नव्हत्या. असे असतांना बँक अधिकारी पीक विमा काढण्यासाठी पीक पेरणीचा अहवाल मागवत होते. पेरणीच नाही तर पीक पेरणीचा अहवाल आणणार कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. त्यामुळे यंदा पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सरासरी क्षेत्राचा ३५ टक्के क्षेत्रावर जेमतेम पीकविमा काढला गेला आहे.
गेल्या वर्षी तब्बल ७० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी विमा काढला होता. पंरतु गेल्या वर्षीचा खरीप हंगाम चांगला होता. पिकांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे विम्याचे पैसे मिळाले नाहीत. विमा काढून काहीच उपयोग होत नाही असा समज शेतकऱ्यांनी करून घेतला. त्यामुळे यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही. ‘कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायाचा का?’, असा खोचक प्रश्न शेतकरी विचारत आहेत. परंतु विम्यामुळे पिकांना सुरक्षा कवच मिळते.
पीक विमा काढला पाहिजे, असा देखील अनेकांचा मत प्रवाह आहे. कृषी विभाग यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत असते. परंतु पीक विम्याचा परतावा कमी राहत असल्याने तसेच यंदा विविध निकष बदलण्यात आल्याने देखील यंदा परिणाम दिसून येत असल्याचे चित्र आहे.