नंदुरबार : जिल्ह्यात सध्या कधी नव्हे इतकी गंभीर परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झाली आहे. आधीच जिल्ह्यात बेरोजगारी, गरिबी व आरोग्याचे इतर प्रश्न असताना कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत आहे. अपुऱ्या सोयीसुविधांमुळे रुग्णांची होणारी दमछाक आणि लाॅकडाऊनमुळे गरिबांचे पोटाची खळगी भरण्यासाठी होणारे हाल खरोखरच वेदनादायी आहेत. अशा स्थितीत लोकांना मदतीऐवजी त्यांच्या गरजेचा फायदा घेणारेच जागोजागी भेटत असल्याने जिल्ह्यातील जनता कमालीची हतबल झाली असून, आता सर्वांनाच मदतीचे आणि दिशा दाखविणाऱ्या हातांची प्रतीक्षा लागली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, सिटीस्कॅन हे प्रश्न खूप चर्चेत आले आहेत. जिल्ह्यात रोज आठशे ते हजार नवीन रुग्ण सापडत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. डाॅक्टर रुग्णांना ॲडमिट करण्यापूर्वीच सिटीस्कॅन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा सल्ला देत असल्याने सिटीस्कॅन सेंटरसमोर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. ज्या सिटीस्कॅन मशीनवर एरव्ही दिवसाला जेमतेम पाच ते दहा सिटीस्कॅन होत होते त्या मशीनवर आता १५० ते २०० सिटीस्कॅन होत आहे. नंबर लावण्यासाठी रुग्णाला आठ ते दहा तास प्रतीक्षा करावी लागते. अर्थात याठिकाणी रुग्णांचे नातेवाईक व कोरोना पाॅझिटिव्ह नसलेले रुग्णही असतात. त्यामुळे सिटीस्कॅन सेंटरचा परिसर हा कोरोना संसर्ग फैलावणारा सध्याचे हाॅटस्पाॅट केंद्र असल्याचे बोलले जात आहे. रुग्णांसोबत आलेले अर्धे नातेवाईक रेमडेसिवीरच्या शोधात लागतात. त्यामुळे गावभर त्या इंजेक्शनचीच चर्चा सुरू असते.
समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील काही राजकीय मंडळी रेमडेसिवीर इंजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी पुढे आली आहे. त्यांच्याकडेही जेवढा साठा येतो त्यापेक्षा दुपटीने मागणी आहे. या मदत केंद्रांमुळे लोकांचे इंजेक्शनसाठीचे काही प्रमाणात का असेना हाल कमी झाले आहेत; पण त्यालाही आता राजकारणाचा रंग येऊ लागला आहे. राजकारणी म्हटले म्हणजे विरोधात असतातच. त्यामुळे एकमेकांचे चांगले काम एकमेकांना सहन होत नाही. तेव्हा राजकीय कार्यकर्त्यांचे उणेदुणे सुरू होते. तसाच प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू झाला आहे. अर्थात ही सुरुवात आहे ते थांबणे आवश्यक आहे. कारण सध्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या विषयावर राजकारण करण्यापेक्षा लोकांना सेवा देण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. अशा अडचणीच्या काळात कुठल्याही पक्षाच्या नेत्याने कशाही पद्धतीने मदत केली तरी त्या मदतीचे मोल कायम राहणारे आहे.
वास्तविक सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कोरोनाचे आलेले संकट दूर करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. शनिवारी पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. त्यातही सर्वांना यासंदर्भातील आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. या बैठकीतदेखील विविध पक्षांतील नेत्यांनी आपली भूमिका मांडली. त्यात अनेक महत्त्वाचे मुद्देही समोर आले. विशेषत: रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपाचे नियोजन, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी रुग्णांना औषधी उपलब्ध करून देणे, आरोग्य केंद्राच्या ठिकाणीच रुग्णांना विलगीकरण करणे, लोकांचे योग्य समुपदेशन करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणे, असे अनेक मुद्दे चर्चेत आले. आता निर्णय काय होतात ती वेगळी बाब, पण जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती पाहता खरच सर्वांनीच गांभीर्याने उपाययोजनांसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. अधिकारी असो की लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था असो की सामाजिक कार्यकर्ते सर्व मिळून एकीच्या बळावर रुग्णांना माफक दरात योग्य उपचार मिळावेत, त्यांचे हाल थांबावेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जे लोक रुग्णांचा गैरफायदा घेऊन त्यांची दिशाभूल करीत आहेत त्यांनाही वेळीच रोखले पाहिजे. कारण या संकटसमयी जो मानवतावादी मूल्यातून काम करील तो निश्चितच लोकांच्या नजरेत ‘हीरो’ ठरेल. त्यांच्यासाठी ‘गिरफ्तार’ या चित्रपटातील बप्पी लहरींनी संगीतबद्ध केलेल्या ‘आना जाना लगा रहेगा, दु:ख जाएगा सुख आएगा, करेगा जो भी भलाई के काम उसकाही नाम रह जाएगा...’ या गीताचे बोल तंतोतंत खरे ठरणार आहेत.