सातपुड्यातील हजारो हेक्टरमध्ये जंगल असून, या जंगल परिसरात मांसभक्षी, तृणभक्षी, विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात लांडगा, बिबट, कोल्हा, काळवीट, हरीण, मोर, खोकड, सायाळ, रानडुक्कर, तरस आदी प्राणी गावच्या बाजूला पाण्याच्या शोधात येत असल्याचे चित्र आहे, तसेच दुर्मीळ किंगफिशर व घार हे पक्षीही या जंगलात आढळतात.
सध्या मार्चच्या तप्त उष्णतेमुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यातील पाणी आटायला लागल्याचे दिसून येत आहे, तसेच यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी सतत वाढणारे तापमान पाहता हे नैसर्गिक पाणवठे तग धरू शकतील का, याविषयी शंका आहे. वन विभागाने या जंगल परिसरात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत; परंतु या पाणवठ्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले असून, ते अद्यापपर्यंत कोरडेठाक आहेत. वाढणाऱ्या तापमानामुळे वन्य प्राण्यांची पाण्याच्या शोधार्थ भटकंती करीत आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
पाणवठे कोरडेठाक असल्याने वन्य प्राण्यांची गाव वस्तीकडे धाव
उन्हाळा सुरू होताच अतिदुर्गम भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यातच वन्य प्राण्यांनादेखील पाणवठे कोरडेठाक होत असल्याने पाण्यासाठी वणवण भटकंती करून गाव वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे. यावेळी वन्य प्राणी गाववस्तीकडे धाव घेत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, संबंधित वन विभागाने जंगलातील पाणवठे पुनर्जिवित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वन्य प्राण्यांसाठी तोरणमाळ रस्त्यालगत पाणवठे तयार करण्यात आले होते; परंतु वन्य प्राणी रस्त्यालगत असलेल्या पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येत असताना अपघातदेखील घडत होते. यासाठी हे पाणवठे कोरडे ठेवण्यात आले असून, वनतळे तयार करण्यात आले आहे. - एस.के खुणे, वनक्षेत्रपाल, राणीपूर.