लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यातील दुर्गम भागातील गावे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी सातपुड्यातील युवक कार्यकर्ते, लोकसमन्वय प्रतिष्ठान आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या प्रयत्नाने सातपुडा संवर्धन मोहिम सुरु केली आहे़ या मोहिमेंतर्गत सातपुड्यातील पाणीटंचाईबाबत प्रशासनाला पाठपुरावा केला जाणार आहे़धडगाव तालुक्यातील नवे तोरणमाळच्या बुरुमपाड्यात पाणी टंचाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ विहिरी आटल्याने डोंगरांवरील पायवाटेने दरीत उतरुन महिला हंडाभर पाणी आणण्यासाठी दररोज सात किलोमीटरपर्यंत पायपीट करुन पाणी आणत आहेत़ पाळीव गुराढोरांना पाणी पाणी मिळावे म्हणून सात किलोमीटरपर्यंत पशुपालक जात आहेत़सातपुड्यातील कुयरीडाबर ता़ तळोदा येथे गाढवावरुन पाणी पोहोचवण्याची वेळ शासनावर येऊनही दुर्गम भागातील स्थिती बदलेली नाही़ तीव्र पाणी टंचाई असलेल्या कुयरीडाबर येथे आजही रस्ता नाही़ अशा स्थितीत कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे़ यात शासनाकडून हात धुवा अशी जागृती सुरु आहे़ परंतू जिथे प्यायला पाणी नाही, तेथे हात धुवायला पाणी आणणार तरी कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे़ यासाठी शासनाकडे लोकसंघर्ष मोर्चा, लोकसमन्वय प्रतिष्ठान पाठपुरावा करत आहेत़ यात सातपुड्यातील त्या-त्या गावातील सामूहिक वन व्यवस्थापन समितीनेही पुढच्या उन्हाळ्यात गांव पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत़ या सर्वांना एक दिशा मिळावी यासाठी सातपुडा संवर्धन मोहिम सुरु करण्यात आली आहे़मोहिमेंतर्गत सातपुड्यातील जंगल पुन्हा उभे करुन सातपुड्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी युवा कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, वन कार्यकर्ते यांनी योगदान देण्याचे तसेच तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन, संकल्पना मांडण्याचे लोकसंषर्घच्या प्रतिभा शिंदे यांनी कळवले आहे़ दरम्यान सातपुड्यातील या टंचाईवर मात करण्यासाठी वस्तूंच्या स्वरुपातही दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे त्यांनी म्हटले आहे़
सातपुडा संवर्धन मोहिमेतून दूर होणार पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:18 IST