सध्या कोरोना महामारीचा प्रचंड उद्रेक वाढला आहे. दररोज शेकडोंच्या संख्येत रुग्ण बाधित होत आहेत. जिल्ह्यातील शासकीय व खासगी सर्व दवाखाने फुल्ल झाली आहेत शिवाय गुजरातमधील सूरत येथेही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. सध्याचा कोरोना स्ट्रेन अतिशय वेगात रुग्णांना गंभीर करत असल्याने जोखीम नको म्हणून रेमडिसीवर इंजेक्शन घेण्याकडे कल वाढला आहे. साहजिकच या इंजेक्शनदेखील प्रचंड मागणी वाढली आहे. तथापि, संपूर्ण जिल्ह्यातच रेमडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. इतकेच नव्हे तर गंभीर रुग्णांसाठीदेखील उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः सर्वत्र भटकत आहेत. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना साकडे घालत आहेत. तळोद्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी धुळे, मालेगाव येथे धाव घेतली आहे. तेथेही मोठ्या मुश्किलीने हे इंजेक्शन मिळत आहे. वास्तविक कोरोना महामारीचा संपूर्ण राज्यात विस्फोट वाढत असल्याने रेमडिसीवर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे प्रशासन व शासनाची जबाबदारी आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याचा तुटवडा भासत असताना कुठलीच कार्यवाही केली जात नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गुजरातमध्येही इंजेक्शन मिळेना
नंदुरबार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुजरात असल्याने येथील रुग्णांचे नातेवाईक रेमडिसीवर इंजेक्शन घेण्यासाठी गुजरातमधील सूरत बोराडोली, उच्छल, सोनगढ येथे जात आहेत. परंतु तेथील मेडिकल चालक गुजरातच्या पेशंटव्यतिरिक्त बाहेरच्या रुग्णाचे बिलिंग करत नसल्यामुळे इंजेक्शन देत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नातेवाईकांना निराश होऊन परत यावे लागत आहे. इकडे रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर होत असल्याने नातेवाईकांची मानसिकता खचली आहे. तळोद्यातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी इंजेक्शनसाठी अथक परिश्रम घेत आहे. त्याबाबत नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी
नंदुबार, शहाद्यानंतर तळोद्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांसाठी तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालय व तालुक्यातील सलसाडी येथे कोविड कक्ष उभारण्यात आले आहेत परंतु ऑक्सिजन बेडची संख्या मोजकीच आहे. तेथे संख्या वाढविण्याची अपेक्षा असताना अजून कार्यवाही केली जात नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक येथे गरीब, आदिवासींची संख्या मोठी आहे. हे रुग्ण बाहेर खासगी दवाखान्यात महागडा उपचार घेऊ शकत नाही. प्रशासनाने याप्रकरणी ठोस कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहरातील रुग्णांसाठी रेमडिसीवर इंजेक्शनची नितांत गरज भासत असल्याने धुळे, नंदुरबार येथे उपलब्ध नसल्यामुळे मालेगाव येथे धाव घेतली. येथेही मोठ्या मुश्किलीने मिळाले.
-जितेंद्र दुबे, तळोदा शहरप्रमुख, शिवसेना