रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पक्षांतराच्या लाटेत भाजपने काँग्रेसचे अनेक मोहरे आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले असले तरी पक्षाला मात्र जिल्ह्यात जागा वाढवता आल्या नाहीत. असे असले तरी भाजपच्या दृष्टीने मात्र आगामी राजकीय वाटचाल सुकर असल्याचे चित्र आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा 2019 मध्ये चांगले मताधिक्य मिळविण्यात पक्षाला यश आले ही जमेची बाजू आहे.नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय इतिहासाचा मागोवा घेतल्यास जिल्ह्यात सन 2000 पूर्वी भाजपला तळोदा वगळता इतर ठिकाणी यश मिळवता आले नव्हते. स्व.दिलवरसिंग पाडवी यांच्या रुपाने त्या भागात भाजपची रुजवणी झाली. त्यांनीच आदिवासींचे वनजमिनीचे व इतर प्रश्न चर्चेत आणल्याने आदिवासी मतदार त्याकाळी भाजपशी जुळले. 2000 नंतर मात्र राजकारण काहीसे बदलू लागले. काँग्रेसचा एकतर्फी राजकारणाला सुरुंग लागून विरोधक वाढले. त्यातच 2014 मध्ये डॉ.हीना गावीत यांनी भाजपत प्रवेश केला. त्यांच्यासोबत डॉ.विजयकुमार गावीत यांनीही राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केल्याने काँग्रेसच्या विरोधात उभी झालेली राष्ट्रवादीची फळी सरळ भाजपच्या संपर्कात आली आणि प्रथमच या भागात भाजपच्या खासदार डॉ.हीना गावीत ह्या निवडून आल्या. अर्थात लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधिक्य 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला टिकवता आले नाही. त्यावेळी नंदुरबारमधून डॉ.विजयकुमार गावीत व शहाद्यातून उदेसिंग पाडवी हे दोन भाजपचे आमदार विजयी झाले होते. तर अक्कलकुवा आणि नवापूरमध्ये भाजपच्या उमेदवारांना खूप काही समाधानकारक मते मिळाली नव्हती. त्यावेळी चारही ठिकाणी भाजपने निवडणूक लढवली होती. या चारही ठिकाणच्या भाजपच्या उमेदवारांना दोन लाख तीन हजार 621 मते मिळाली होती. नवापूरमध्ये तर सर्वात कमी म्हणजे जेमतेम 11 हजार 236 मते मिळाली होती.या पाश्र्वभूमीवर 2019 मध्ये मात्र पक्षाने चांगली कामगिरी केल्याचे चित्र आहे. गेल्यावेळी युती नव्हती. तरी अर्थातच राजकीय गट-तटात त्यावेळी युतीचे फारसे परिणामकारक चित्र नव्हते. पण 2019 मध्ये युती होती. भाजपला जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी अक्कलकुवा वगळता तीन मतदारसंघ मिळाले होते. या तीनपैकी दोन जागा कायम राखण्यात भाजपने यश मिळवले आहे. जमेची बाजू म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मताधिक्य वाढले आहे. तीनच ठिकाणच्या भाजपच्या उमेदवारांना दोन लाख 68 हजार 572 मते मिळाली आहेत. याशिवाय अक्कलकुव्याची जागा शिवसेनेला होती. तेथील मताधिक्य मिळविल्यास ही मतांची संख्या तीन लाख 49 हजार 104 होते.एकूणच गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपची कामगिरी चांगली राहिली असली तरी गटातटातील चित्र मात्र आव्हानात्मक आहे. या निवडणुकीत नवापूरमधून भरत गावीत व शहाद्यातून दीपक पाटील आणि राजेंद्र गावीत यांनी भाजपत प्रवेश केला. त्याचा निश्चितच फायदा झाला. कारण नवापूरमध्ये यापूर्वी भाजपला फारशी मते मिळत नव्हती. परंतु या निवडणुकीत भरत गावीत यांनी उमेदवारी केल्याने भाजपचे मताधिक्य प्रचंड वाढले आहे. गेल्यावेळी मिळालेली 11 हजार मते यंदा 53 हजारावर गेली आहेत. हे भरत गावीत व माणिकराव गावीत यांच्या भाजप प्रवेशातील फलित आहे. तर शहाद्यातही मताधिक्य प्रचंड वाढले आहे. गेल्यावेळी शहाद्यात भाजपला 58 हजार 356 मते मिळाली होती. या वेळी मात्र तेथे 94 हजार 405 मते भाजपच्या उमेदवाराला मिळाली आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचाही संघटनात्मक बांधणीत त्यात वाटा आहे. त्यांच्याच पुढाकाराने भाजपत काँग्रेसच्या पदाधिका:यांनी प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावरच भाजपत संघटनात्मक बदल करून चौधरी यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते. अल्पकाळातच त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचाही त्यात मोठा वाटा आहे.भाजपच्या अनेक पदाधिका:यांनी विधानसभा निवडणुकीत निष्ठेने आणि अहोरात्र झटून परिश्रम घेतले हे वास्तव असले तरी या परिश्रमात मात्र गटबाजीचा निश्चितच आघात राहिला आहे. खास करून नवापूर आणि अक्कलकुवा येथे युतीला जो फटका बसला त्याबाबत निश्चितच युतीच्या नेत्यांना चिंतन करण्याची गरज आहे. जर सर्व नेत्यांमध्ये संवाद व समन्वय राहिला असता तर एखाद्यावेळी चित्र याहून वेगळे राहिले असते. याबाबत पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या परीने विश्लेषण करतीलच मात्र आगामी काळात भाजपला निश्चितच नेते, कार्यकत्र्यामध्ये समन्वय राखण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. आज पक्षाचे सर्व नेते एकत्र असल्याची जरी वरवर बतावणी होत असली तरी प्रत्यक्षात मात्र नेत्यांमधील मतभेद आणि वास्तव राजकीय चित्र सर्वश्रुत आहे. त्यामुळे पक्षाला आगामी काळात जिल्ह्यातील गटबाजी रोखणे हेच आव्हान राहणार आहे.
2014 च्या निवडणुकीत भाजपला मिळालेली मते
2,03,621
लढवलेल्या जागा - 04
विजयी - 02
2019 च्या निवडणुकीत भाजपला मिळालेली मते
2,68,572
लढवलेल्या जागा - 03
विजयी - 02