लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : वाहनावरून जाहीर प्रचार न करण्याचा व गावकऱ्यांची एकाचवेळी उमेदवाराने भेटी घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या भरडू गटातील पाच गावांनी घेतला आहे. निवडणुकीतील खर्चास या निर्णयामुळे लगाम बसणार आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १० व पंचायत समितीच्या २० गणांसाठी निवडणुकीची धामधुम सुरू आहे. ग्रामीण भागात या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी उमेदवारांकडून आवश्यक कागदपत्रे व शपथपत्रे आदीं बाबत तयारी सुरू असल्याने व त्यातच पहिल्यांदा आॅनलाईन नामांकन दाखल करावे लागणार असल्याने त्यातील बारकावे पाहता नामांकन दाखल होऊ शकलेले नाही. सोमवारी ही प्रक्रिया जोर धरेल अशी शक्यता आहे.निवडणुक म्हटली की, प्रचार यंत्रणा, वाहने, प्रचार पत्रक, जाहीरनामा व त्या अनुषंगाने उमेदवारावर खर्चाची जबाबदारी येते. प्रचारासाठी राबणाºया हातांची काळजी घेणेही उमेदवारास क्रमप्राप्त ठरते. तालुक्यातील सर्वच्या सर्व १० गट व २० गण अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. भरडू गट अनुसूचित जमाती सर्वसाधारण असून, त्यातील भरडू व वडफळी हे दोन्ही गण अनुसूचित जमाती महिला राखीव आहेत. गटात भरडू, महालकडू, केलपाडा, सोनारेदिगर, शेतगाव, भांगरपाडा, खर्जे, तारपाडा, मोठे कडवान, लहान कडवान, वडफळी, तारापूर, डोगेगाव, वहांदे, जामदा, अंजने व बिलदा या गावांचा समावेश आहे. यातील तारपाडा, बिलदा, जामदा, डोगेगाव व अंजने या पाच गावातील बहुसंख्यक ग्रामस्थांनी निवडणूक खर्चास फाटा देण्याबाबत सहमती दर्शविली आहे. वाहनांमधून होणारा प्रचार पाहता गटातील प्रत्येक गावी फिरण्यासाठी वाहने व कार्यकर्ते यांच्यावर उमेदवारास खर्च करावे लागते. ग्रामीण भागात शेतकामांना सकाळी लवकर सुरूवात होते व दुपार पावेतो ही कामे चालतात. गावात सहसा या कालावधीत शुकशुकाटच असतो. अश्या काळात वाहनांमधून होणारा प्रचार फारसा परिणामकारक ठरत नाही. त्याऐवजी ग्रामस्थांची हाऊस टु हाऊस प्रत्यक्ष भेट व्हावी किंवा एकत्रितपणे कॉर्नर सभेच्या माध्यमातून लोकांना उमेदवारास भेटता यावे असे शक्य असल्याने या पाच गावांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. गटातील इतर गावे व तालुक्यातील इतर गटांनीही असा आदर्श घेतल्यास ग्रामीण भागातील प्रचाराचे स्वरुपच बदलतील अशी शक्यता आहे.
वाहनावरून जाहीर प्रचार न करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 13:02 IST