सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथे गेल्या २५ एप्रिलपासून ते आजपावेतो म्हणजे १२ दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह निघालेला नाही. ही गावासाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी प्रकाशा ग्रामपंचायत, महसूल, आरोग्य, पोलीस व शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे सार्थक झाले आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत प्रकाशा येथे कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. ९ सप्टेंबर २०२० रोजी पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर मात्र रुग्णसंख्येत वाढ झाली होती. गेल्यावर्षी गावात १०९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी म्हणजे १ जानेवारी २०२१ ते २५ एप्रिल २०२१ पर्यंत ९५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत २०४ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
२५ एप्रिलपासून प्रकाशा गावात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. ही गावासाठी शुभ वार्ता आहे. आता मात्र गावाने सतर्कता ठेवली आहे. ग्रामस्थांनीही केलेले सहकार्य, वेळोवेळी झालेल्या लॉकडाऊनला ग्रामस्थांनी चांगलीच साथ दिली. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. अजूनही जर प्रकाशेकरांनी संयम ठेवला तर नक्कीच पुढचे दिवस चांगले येतील, यात शंका नाही.
प्रकाशा ग्रामपंचायतीचे कार्य उल्लेखनीय
ग्रामपंचायतीने वेळोवेळी स्वतः निर्णय घेऊन गावात सातवेळा लॉकडाऊन केले आहे. पाचवेळा गावात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली. गावात स्वच्छता राहावी म्हणून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी फिरवून स्वच्छतेकडे लक्ष दिले जात आहे. ‘माझी वसुंधरा’ या अभियानांतर्गत गावात विविध उपक्रम ग्रामपंचायतीने राबवले आहेत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत दोनवेळा गावात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामरक्षक दल स्थापन करून ज्या ठिकाणी रुग्ण निघाला होता त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आला होता. तसेच विनामास्क फिरणाऱ्या लोकांना प्रकाशा ग्रामपंचायतीने दंडाच्या पावत्या देऊन धडाही शिकवलेला आहे. यात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे.