लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सात ते आठ महिन्यापासून विद्यावेतन न मिळालेल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विविध अडचणी येत आहेत. याची दखल घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयटीआयमध्ये एक तास ठिय्या दिला. त्यानंतर लवकरच विद्यावेतन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्राचार्यानी दिले.नंदुरबार येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या सात, आठ महिन्यांपासून अडकलेले विद्यावेतन विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या. अनेक दिवसांपासून अडकलेले विद्यावेतन विद्यार्थ्यांना लवकर मिळावे यासाठी आज अभाविप नंदुरबार शाखेने औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे ठिय्या दिला.यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे विद्यावेतन त्यांच्या खात्यात जमा करावे व भविष्यात विद्यार्थ्यांना अशा अडचणी येऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी अभाविप नंदुरबार जिल्हा संयोजक निलेश हिरे यांनी केली.तासभर चाललेल्या या मागणीच्या आंदोलनाची प्रभारी प्राचार्य आर.पी.पाटील यांना दखल घ्यावी लागली. अभावीपच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून येत्या चार ते पाच दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यात विद्यावेतन जमा केले जाईल असे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा संयोजक निलेश हिरे, शहर वस्तीगृह प्रमुख किशोर कोळेकर, आशिष नाईक, उमेश जगताप, निलेश सूर्यवंशी आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यावेतनसाठी आटीआयमध्ये ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:13 IST