ऑनलाईन नोंदणीप्रमाणे केंद्रात जाऊन देखील नोंदणी करण्याची मुभा असल्याने नागरिकांसाठी ते सुटसुटीत झाले आहे. शनिवारपासून या वयोगटासाठी लसीकरण केले जाणार असल्याची माहिती बऱ्याच जणांना नव्हती. त्यामुळे काही केंद्रांवर शुकशुकाट होता तर काही केंद्रांवर सकाळी ११ वाजेनंतर रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण तीन लाख ४६ हजार जणांचे लसीकरण झाले असून त्याची टक्केवारी जवळपास २३ टक्क्यांपर्यंत गेली आहे. किमान ५० टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. १५ हजार ५०० पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. फ्रंटलाईन वर्कर असलेल्या ३९ हजार १८० जणांनी, १८ ते ४४ वयोगटातील १४ हजार २८९ जणांनी तर ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील दोन लाख २१हजार ८४२ जणांनी लस घेतली आहे.
शहरी भागात अनेकजण लस घेण्यास पुढे येत नसल्याची स्थिती आहे. त्यासाठी विविध पातळीवर जनजागृती केली जात आहे, परंतु उपयोग होत नाही. दुर्गम भागात देखील पूर्वी ही स्थिती होती, परंतु जनजागृतीच्या माध्यमातून संबंधितांचे मतपरिवर्तन केले गेल्याने दुर्गम भागात देखील लसीकरणाला वेग आलेला आहे. पावसाळा संपेपर्यंत किमान ५० ते ६० टक्के जणांचे लसीकरण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे.