ब्राम्हणपूरी : हरवलेली मुलगी मेल्याचे समजून तिचे उत्तर कार्यही आटोपल्यानंतर ती दोन वर्षांनी घरी येऊन पोहचल्याचा प्रकार कलमाडीतर्फे बोरद, ता.शहादा येथे घडला.
कलमाडीतर्फे बोरद येथील सुभाष पुंजू भिल हे आपल्या परिवारासोबत २०१९ मध्ये साैराष्ट्र (गुजरात) मध्ये मजुरीसाठी गेले होते. तेेथे त्यांची १२ वर्षाची सुनिता नावाची मुलगी हरवली होती. मुलगी शोधूनही सापडली नव्हती. त्यामुळे तीचा मृत्यू झाला असावा असे समजून कुटूंब गावी आले. गावी आल्यावर त्यांनी तीचे उत्तरकार्यही केले. परंतू ती अहमदाबाद जिल्ह्यातील मंगल मंदिर मानव सेवा परिवार बगोदरा, ता.बावला, जि.अहमदाबाद येथे होती. तिला नाव, गाव सांगता येऊ लागल्यावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला पोलिसांच्या मदतीने कलमाडीतर्फे बोरद येथे पोहचविले. मुलगी घरी आल्याचे पाहून तिची आई आणि भावाला आनंदाश्रू रोखता आले नाही.