लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा शहरात बेशिस्त पार्किंगमुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंग व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली असून, संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.तळोदा हे तालुक्याचे शहर असून, विविध कामानिमित्त ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. तसेच ग्रामीण भागातदेखील आवश्यक त्या प्रमाणात सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने दुचाकी वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र शहरातील रत्यावर फिरणारे दुचाकीधाकर बेशिस्तपणे कुठेही वाहने उभी करीत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचा झाला असून, शहरातील अतिक्रमण, अरूंद रस्ते, लॉरीधारक रस्त्यावरच बेशिस्तपणे उभे राहत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील बनत चालला आहे. वळण रस्त्याअभावी शहरातून सर्व प्रकारची जड व अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यातच दुचाकीधारकांनी व अन्य वाहनधारकांनी बेशिस्तपणे केलेल्या पार्किंगमुळे इतर वाहनधारकांना वाहने मार्गस्थ करताना तारेवरची कसरत करावी लागते. सकाळ व संध्याकाळच्या सुमारस या प्रकारामुळे नागरिकांना पायी चालणेदेखील जिकरीचे ठरत असल्याचा अनुभव काही सुज्ञ नागरिकांना बोलून दाखविला.दरम्यान, तळोदा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाकडून केवळ प्रासंगिक उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसून आले आहे. शहरातील अतिक्रमण मोठा गाजावाजा करून अनेकदा काढण्यात आले. परंतु काही कालावधीनंतर अतिक्रमण पुन्हा जैसे थे होत असल्याचा अनुभव आहे.दरम्यान, वाहतुक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यासाठी अतिक्रमण हटविणे व बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. तसेच रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या कमी करण्यासाठी तळोदा शहरात प्रायोगिक तत्वावर सम-विषम यासारख्या पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे सांगितले जाते.
बेशिस्त पार्र्कींगमुळे वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:45 IST