सध्या ग्रामीण भागात शेतकरी शेतीच्या कामांत व्यस्त आहेत. बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतातील भात पेरणीसाठी चिखलणीची कामे करीत आहेत. शेतकरी खरीप पेरणीच्या कामात आहेत. शेतात एक तासाच्याा नांगरणीसाठी छोट्या ट्रॅक्टरला ४००, तर मोठ्या ट्रॅक्टरचा ८०० रुपये खर्च येत आहे. मागील काही वर्षांपासून लाकडी नांगर, बैलगाडीसह इतर शेती उपयोगी अवजारे कालबाह्य झाली आहेत. नवनवीन यंत्रामुळे पारंपरिक पद्धतीने होणारी शेती मशागत आता केली जात नाही. दरम्यान, शेतीकामासाठी लागणारी सर्व लोखंडी अवजारे मिळत आहेत. लाकडी अवजारांची वाढती किंमत मजुरी व दुरूस्तीचा खर्च अधिक, तसेच लाकडी अवजारे दोन - तीन वर्षांनी खराब होत असल्याने शेतकरी लोखंडी अवजारे वापरत आहेत. लाकडाच्या तुलनेत लोखंडी अवजारे अधिक उपयुक्त ठरत आहेत. पेरणीसाठी लागणारे लाकडी नांगरही आता कमी होत आहेत. जनावरे सांभाळणे कठीण झाल्यानेही शेतकऱ्यांकडून लोखंडी अवजारांना मागणी आहे. दरम्यान, शेती व्यवसायात आलेल्या अत्याधुनिक साहित्यामुळे कधी काळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाऱ्या सुतार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. रेडिमेड अवजारांमुळे बलुतेदारी अडचणीत आली आहे.
पूर्वी किती नांगर आहेत, यावर सधन शेतकरी ओळखला जायचा, जास्त बैलगाड्या, जास्त नांगर तो मोठा शेतकरी समजला जाई. कमी शेती असेल तरी एक नांगर व बैलजोडी असायची, पण आता शेतीसाठी आधुनिक उपकरणे आली, तसेच गोधन राखण्यासाठी माणूस व चरण्यासाठी जागा नसल्याने आज गोधन कमी झाल्याने लाकडी नांगरही कालबाह्य झाले आहेत.
सध्या बैलगाडीच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे बैलजोडी खरेदी करण्यापूर्वी शेतकरी विचार करीत आहेत. इतकेच नव्हे, तर गुरे चरणाच्या जागाही नष्ट झाल्या आहेत, याशिवाय शेतात मजूर मिळत नसल्याने शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा अधिक वापर होत आहे.