लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहर आणि जिल्ह्यातील स्थलांतरीत झालेले मजुरांना आणण्यासाठी गुजरात राज्यात नंदुरबार आगारातर्फे आज शुक्रवारी सायंकाळी तीन बसेस रवाना करण्यात आल्या. अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली.जिल्ह्यातून गुजरात राज्यातील अहमदाबाद आणि हरिपुरा येथे गेलेल्या मजुर कुटूंबांना आणण्यासाठी प्रशासनाने जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आगारप्रमुख मनोज पवार यांनी तीन बसेस रवाना करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यादीनुसार गुजरात राज्यातील स्थलांतरीत मजुरांना नंदुरबार जिल्ह्यात स्वगृही आणण्यात येणार आहे.या प्रवाशांचे नियमानुसार यादी तयार करून प्रकल्प अधिकारी नंदुरबार आणि तळोदा यांनी नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांच्याकडे यादी आणि प्रवास भाडे सुपुर्द केले आहे. कालावधीत देखील शासन आदेशानुसार आणि वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे युद्धपातळीवर काम सुरू आहे. याकामी चालक-वाहक, यांत्रिक पर्यवेक्षक कर्मचारी, सर्व प्रशासकीय कर्मचारी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे.नंदुरबार जिल्ह्यातील स्थलांतरित मजूर, कामगार अथवा विद्यार्थी किंवा अन्य प्रवासी इतर जिल्हा किंवा राज्यात अडकले असल्यास ग्रुप नुसार त्यांना नंदुरबारला आणण्याचे नियोजन एसटी महामंडळातर्फे सुरू आहे. मात्र यासाठी नंदुरबारसह संबंधित ठिकाणांच्या जिल्हाधिकारी यांची सशर्त परवानगी आवश्यक आहे.नाव नोंदणीसाठी नंदुरबार आगार (०२५६४-२२२४९५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.