नंदुरबार : जिल्ह्यात साधारणत: साडेतीन हजार शाळाबाह्य व स्थलांतरित बालके आढळल्याची शक्यता आहे. तालुका स्तरावरून आकडेवारी एकत्र करण्याचे काम सुरू असून येत्या दोन दिवसात ते पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात १ ते १० मार्च दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी मोहीम आयोजित करण्यात आली होती. एकूण ९६ पथकांद्वारे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. तालुकास्तरावर हे काम पूर्ण झाले असून जिल्हास्तरावर आता त्याची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे. राज्यस्तरावरून १० रोजी सायंकाळी उशिरा माहिती एकत्रित करण्यासंदर्भातील फॉर्मेट उपलब्ध झाला. त्यामुळे विश्लेषणात्मक माहिती पूर्ण करून ती जिल्हास्तरावर दोन दिवसात उपलब्ध होणार आहे.
असे असले तरी यंदा जिल्ह्यात साडेतीन हजार स्थलांतरित व शाळाबाह्य बालकांची नोंद झाल्याचा अंदाज शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. येत्या काळात अशा विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना शासनाने जिल्हा शिक्षण विभागाला दिल्या आहेत.