जयपूर येथे नुकतेच हे संमेलन झाले. यात महाराष्ट्र, गुजरात, आसाम, झारखंड, छत्तीसगढ, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश यासह देशातील २३ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. या संमेलनात आदिवासींच्या अस्तित्त्वाबाबत चर्चा करण्यात आली. आदिवासी हा हिंदू नसून, प्रकृतीपूजक आहे आणि हिंदूपासून त्याची संस्कृती वेगळी आहे. इतर कुठल्याही धर्मात आदिवासींना ओढणे हे संविधान आणि मानवतेला धरुन नाही. इंग्रजांच्या काळात जनगणना प्रपत्रामध्ये ओर्बोजिनीज, ॲनिमिस्ट, ट्रायबल असे म्हणून ओळख होती. मात्र, स्वतंत्र भारतात जनगणनेच्या नावाने आदिवासींचे अस्तित्व दाबले जात आहे. त्यामुळे यापुढे जनगणनेत आदिवासींचा स्वतंत्र कॉलम असावा, अन्यथा तीव्र संघर्ष करण्याचा ठराव या संमेलनात करण्यात आला.
या संमेलनात खासदार गोपाललाल मीना, भारतीय ट्रायबल पार्टीचे आमदार राजकुमार रोत, रामप्रसाद दिंडोर, रामटेक वीना, रफीक खान आदी राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही या ठरावाला समर्थन देत त्यासाठी आवाज उठविणार असल्याची ग्वाही दिली. आदिवासी साहित्यिक वाहरु सोनवणे यांनी देशातील आदिवासींनी आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येऊन लढा उभारण्याचे आवाहन केले. यावेळी जोराम यालाम, कर्नाटकचे साहित्यिक कुमुदा सुशील, कवी संतोष पावरा यांनीही कविता सादर करुन आपले विचार मांडले.