उन्हाळा सुरू झाला की, सर्वसामान्य नागरिक थंडगार पाण्यासाठी माठाची खरेदी करतात. त्यातून काही प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. परिणामी माठनिर्मिती करणाऱ्या कुंभार समाजातील कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध होत असतो. विशेष म्हणजे बदलत्या काळानुसार फ्रिज आला असला तरी माठातील पाणी चवीला चांगले असते. तसेच आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही; म्हणून नागरिक माठच खरेदी करतात. ग्रामीण भागातील नागरिक थंड पाण्यासाठी सर्वाधिक मातीच्या माठाचा वापर करतात.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. त्यामुळे ग्राहक घराबाहेर पडणे पसंत करीत नाहीत. परिणामी आठवडेबाजारही बंद असल्याने खरेदीसाठी कोणीही येत नसल्याने दिसून येत आहे.
माठनिर्मिती करणाऱ्यांनी माती आणि भुस्सा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठांची निर्मिती केली आहे; परंतु ग्राहकांकडून मागणीच नसल्याने हे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे यंदा तरी केलेला खर्च निघेल की नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे. गोरगरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठांची शहरासह ग्रामीण भागांत दुकाने लागली आहेत. मात्र ग्राहक खरेदी करीत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परिणामी हा व्यवसाय संकटात सापडला आहे. शहरातील कुंभार गल्ली परिसरातील माठविक्रेते हे स्वतः माठ तयार करून शहरी व ग्रामीण भागांत विक्री करतात. तसेच इतर विक्रेत्यांनाही पुरवठा करतात. बहुतांशजण पिढ्यान्पिढ्या हा व्यवसाय करीत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य या व्यवसायासाठी राबतात. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत असतो. मात्र कोविड महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावात हा व्यवसाय संकटात सापडला असल्याने छोटे-मोठे व्यावसायिक विक्रेते आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, अशी चिंता लागली असल्याचे माठविक्रेत्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटामुळे व्यवसाय ठप्प
माठांची निर्मिती करून विक्री करणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. गेल्या चार पिढ्यांपासून आम्ही हा व्यवसाय करतो. आमची मुले दुसऱ्या व्यवसायात होती; परंतु कोरोनाच्या संकटामुळे ती पुन्हा आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे परतली आहेत.
गेल्या वर्षी उन्हाळ्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने हा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आला होता. यंदाही कोविड महामारीच्या प्रादुर्भावामुळे उपासमारीचे चटके सोसावे लागतील की काय, अशी भीती माठविक्रेत्यांनी व्यक्त केली.
- कांतिलाल कुंभार
शेती अथवा नदीकाठावरून माती आणून तिला राख लावून तिला आकार देणे व भट्टी तापविणे अशीही माठ बनविण्याची प्रक्रिया आहे; परंतु कोरोनाच्या संकटामुळे माठविक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे खर्चही निघणार की नाही, अशी स्थिती आहे.
- छगन कुंभार