नंदुरबार : नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून, सर्वांना उत्सुकता ११ वीत प्रवेश घेण्याची आहे. विद्यार्थ्यांचे कॉलेजला जाण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. परंतु सीईटीची अडचण आता त्यांच्यापुढे उभी ठाकली आहे. कधी एकदाची सीईटी होते व आवडत्या कॉलेजला प्रवेश मिळतो याबाबत विद्यार्थी उत्सुक आहेत.
यासाठी शिक्षण मंडळाने सीईटीचा प्रवेश ऐच्छिक ठेवलेला आहे. सर्वांनाच अकरावीत प्रवेश मिळणार आहे. मात्र सीईटीची वेबसाईट वारंवार बंद पडल्याने, नोंदणी कशी करावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे.
जिल्ह्यात अकरावीच्या कला, विज्ञान, वाणिज्य आणि संयुक्त अभ्यासक्रमासाठी १६,३२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. मात्र दहावीची परीक्षा २१ हजार जण उत्तीर्ण झालेले आहेत. राज्य शिक्षण मंडळाकडून २१ ॲागस्ट रोजी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना २६ जुलैपर्यंत ॲानलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. एकूण चार विषयांवर प्रत्येकी २५ गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. शंभर गुणांसाठी १०० प्रश्न असणार आहे. या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाने तयारी केली आहे. तालुक्याच्या ठिकाणी परीक्षेसाठी केंद्र असेल. परीक्षेसाठी दोन तासांचा अवधी असेल. वेबसाईट हँग झाल्याने, विद्यार्थ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. कधी एकदाचा प्रवेश होतो याकडे आता विद्यार्थी लक्ष देऊन आहेत.