लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने विनामूल्य सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनही दिले. तसेच बडवाणी (मध्यप्रदेश) येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले.या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे देशात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. त्याचा सामना सरकारला करावा लागत आहे. त्या कार्यात आपलाही सहभाग असल्याचे स्पष्ट करून त्यांनी म्हटले आहे की, या परिस्थितीत देशातील गरीब श्रमिकांवर महासंकट कोसळले आहे. अन्न, निवारा या मुलभूत समस्यांपासूनही ते दुरावले आहे. त्यामुळे नाईलाजाने महानगरांमध्ये अडकलेले हे असुरक्षित श्रमिक आपापल्या गावी परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना रोखले जात असल्याने लपून छपून ते गुन्हेगारांसारखे आपल्या गावीत वाटेल ते दाम देवून जात आहेत. काहीजण शेकडो किलोमीटर पायीच प्रवास करीत आहेत. या दगदगीत काहींचा रस्त्यांवरच मृत्यूही झाला आहे. हे चित्र देशासाठी व महाराष्टÑासाठीही लाजीरवाने असून, माणुसकीला कलंक लावणारे आहे.नुकताच शासनाने या अडकलेल्या मजुरांना घरी परतण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला असला तरी राज्या राज्यांमध्ये समन्वय नसल्याने व इतर तांत्रिक बाबींमुळे घरी परतण्यासाठी लोकांना प्रचंड अडचणी येत आहेत. ही बाब पाहता शासनाने या अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सुरक्षित व विनामूल्य व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. दरम्यान, याच मागणीसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोमवारी बडवाणी (मध्यप्रदेश) येथे २४ तासांचे लाक्षणिक आंदोलन केले.
श्रमिकांना विनामूल्य गावी पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:19 IST