नंदुरबार : शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेचे काम जिल्हाभरात ९४ पथकांद्वारे सुरू आहे. यासाठी सर्वच केंद्रांवर काम सुरू करण्यात आले आहे. असे असले तरी घरोघरी आणि दारोदारी जातांना कोरोनाची भीती या पथकांना सतावत आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पथकातील कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असल्याचे चित्र आहे. विहित मुदतीतच सर्वेक्षण पूर्ण करण्याचा दबाव पथकांवर आहे.
नंदुरबार जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मजूर स्थलांतर, रोजगारासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी जाणारे कुटुंब यासह इतर कारणे त्याला कारणीभूत आहेत. याशिवाय यंदा शाळाच सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळेदेखील शाळाबाह्य मुलांची संख्या मोठी राहण्याची शक्यता आहे. शासनाच्या आदेशानुसार शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कर्मचारी भीतीच्या वातावरणातच ही मोहीम राबवित आहेत. आपल्यासह सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाणाऱ्यांचीही काळजी त्यांना घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. निर्धारित वेळेत त्यांना हे सर्वेक्षण पूर्ण करावयाचे आहे.
यंदा शाळा बंद असल्याने व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने ही मोहीम रद्द करावी लागेल, अशी चर्चा शिक्षण विभागात सुरू होती. त्यामुळे अनेकांनी कामच सुरू केले नसल्याचे शुक्रवारपर्यंत दिसून आले. परंतु शासनाने मोहीम सुरूच राहणार असून रद्दचा विचार नाही. निर्धारीत वेळेत पथकांनी आपले काम पूर्ण करावे, असे स्पष्ट केल्याने शनिवारपासून गती मिळणार आहे.
१ मार्चपासून हे सर्वेक्षण सुरू होणार असून १० मार्च रोजी त्याचा समारोप होणार आहे. मोहिमेत ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत यामधील जन्म मृत्यू नोंदींचा वापर प्रामुख्याने करण्यात येणार आहे. कुटुंब सर्वेक्षण करताना तात्पुरते स्थलांतर करणारी कुटुंबे व मूूळ वस्तीतून अन्य वस्तीत स्थलांतर होऊन आलेले कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या ठिकाणी होईल पाहणी...
०६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेताना जिल्हा, तालुका, केंद्र, वाॅर्ड, गाव, अशा विविध स्तरावर स्थापन करण्यास सूचना देण्यात आल्या. तसेच सर्वेक्षण हे प्रत्येक गावात होणार आहे. वाड्यावस्त्या, गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, झोपडपट्टी, लोककलावंतांची वस्ती, फूटपाथ, गुऱ्हाळघर, साखर कारखाने, विटभट्ट्या, दगडखाण, मोठे बांधकामे, शेत शिवार, ऊसतोड कामगारांची वस्ती, स्थलांतरित होऊन आलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
वेळेत पूर्ण करणार...
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणाचे काम जिल्ह्यात वेळेत पूर्ण होणार असल्याचा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी डॅा.राहुल चौधरी यांनी व्यक्त केला. सर्व पथकांकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. सर्वेक्षणाचे काम नियमितपणे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.