नंदुरबार : स्वस्त धान्य दुकानांसाठी साखरेचा पुरवठा करणार्या साखर कारखान्यांनी पुरवठा करण्यास नकार दिल्याने जिल्ह्यातील तीन लाख १२ हजार ९०३ शिधापत्रिकाधारकांना साखर मिळालेली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून ही स्थिती कायम असल्याने गोरगरिबांना बाजारातून महागड्या दराने साखर खरेदी करावी लागत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गोरगरीब जनतेसाठी शिधापत्रिकेवर अन्नधान्य देण्यास सुरुवात केली. परंतु दिवसेंदिवस वाढणार्या महागाईच्या काळात हेच अन्नधान्य आता स्वस्त धान्य दुकानांवर मिळेनासे झाले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय घटकातील शिधापत्रिकाधारकांना प्रती माणसी ५०० ग्रॅम साखर १३ रुपये ५० पैसे दराने दिली जाते. यातून गरिबांना काहीसा दिलासा मिळत होता. परंतु गेल्या जानेवारी महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानावर साखर मिळत नसल्याने गोरगरिबांना बाजारातून ३२ रुपये प्रती किलोने साखर खरेदी करावी लागत आहे. सहकारी साखर कारखाने जिल्हा पुरवठा विभागाला साखरेचा पुरवठा करतात. या साखर कारखान्यांना शासनाने निश्चित असे दर ठरवून दिले होते. परंतु नंतर साखर कारखानदारांनी साखर पुरविण्यास नकार दिला. यामुळे अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्र्थींना साखरेपासून वंचित राहावे लागत आहे. एकंदरीत, साखरेसोबतच गहू व तांदूळ कधी मिळतो, याची प्रतीक्षा शिधापत्रिकाधारकांना लागून आहे.
पाच महिन्यांपासून रेशनवरून साखर गायब
By admin | Updated: May 14, 2014 00:37 IST