जयनगर : सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना महामारीमुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण चालू आहे. शाळा ऑनलाईन सुरू होऊन अर्धा महिना उलटला. मात्र शहादा तालुक्यातील अनेक गावांतील विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नेटवर्कच्या शोधात आहेत; कारण शहादा तालुक्यातील लोंढरे, धांद्रे, कुकावल, कळंबू, बोराळे, मातकूट, खापरखेडा या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क पुरेसे नसल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी-सुविधा अजूनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. तसेच तालुक्यातील अनेक गावांमधील मुलांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांच्या शिक्षणाचे काय होणार? हा प्रश्न पालकांसहित शासनाच्याही विचारात असावा.
राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावांमध्ये नेटवर्क व ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा आहेत, ती मुले सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाईन शिक्षणासाठी हजर आहेत. मात्र गरीब विद्यार्थी स्मार्टफोनअभावी तसेच अनेक गावांमध्ये पुरेशा नेटवर्कअभावी बरेच विद्यार्थी ऑनलाईनला मागील वर्षापासून सतत गैरहजर दिसत आहेत. म्हणून अशा विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या तरी अंधारातच दिसत आहे. आताही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने अजूनही शाळा चालू होण्याची चिन्हे दिसत नसून, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईनला गैरहजेरीचे प्रमाण वाढतच राहणार आहे.
गेल्या वर्षी प्राथमिक शाळा उघडल्याच नाहीत; तर माध्यमिक शाळा दोन-अडीच महिने चालल्यावर पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्याने शासनाला पुन्हा या शाळा बंद कराव्या लागल्या. नंतर बोर्डाच्या परीक्षा इतिहासात प्रथमच शासनाला रद्द कराव्या लागल्या आणि सरसकट सगळ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या सगळ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. मात्र तालुक्यात अनेक गावांमध्ये पुरेसे नेटवर्क तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने अनेक विद्यार्थी सलग दुसऱ्या वर्षाच्या शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने काहीतरी उपाययोजना करून अशा नेटवर्क नसलेल्या भागात तसेच स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी, अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
शाळेची इमारत न पाहताच विद्यार्थी दुसरीला
पालकांनी मागील वर्षी सहा वर्षे वय पूर्ण झाल्यावर आपल्या पाल्यांना पहिलीला प्रवेश मिळवून दिला होता. मात्र ॲडमिशन झाल्यावर सलग एक वर्ष शाळेची इमारत न पाहताच मुले दुसरीला गेली आहेत. आताही सहा वर्षे वय झालेल्या मुलांची नावे अंगणवाडीमधून पहिलीसाठी प्रवेशित झाली आहेत. असे विद्यार्थी ऑनलाईनमुळे या वर्षीही शाळा न पाहताच दुसरीला जातील, असे चित्र दिसत आहे.